
ठाणे : ‘स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, हरित ठाणे’ या घोषवाक्यासह ठाणे महापालिकेने गणेश विसर्जनाच्या काळात ठाणेकरांना तब्बल ५ हजार शेवग्याची रोपे मोफत वाटून हरित अभियानाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या रोपांचा दुर्दैवी शेवट उकिरड्यावर फेकलेल्या अवस्थेत झाल्याचे चित्र समोर आले आहे. घाटांवर पानगळ झालेली आणि वाळलेली ही रोपे पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
नागरिकांनी ताशेरे ओढले की, हिरव्या आशा दाखवून आम्हाला फसवलं गेलं. आमच्या पैशातून लाखो रुपये खर्च करून महापालिका फक्त फोटो काढते; पण पर्यावरणाचे रक्षण कोणी करत नाही. ही झाडं पर्यावरण संवर्धनासाठी होती की केवळ महापालिकेच्या फोटोंसाठी? असा प्रश्न काहींनी विचारला आहे.
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले की, “शेवग्याचे झाड आरोग्यासाठी उपयुक्त आहे आणि सोसायटींच्या मोकळ्या जागेत सहज लावता येते. जर कुठे ही रोपे टाकलेली असतील तर ती उचलून त्यांची योग्य जोपासना केली जाईल. ठाणे हे बॅनरवरच हिरवे आहे; प्रत्यक्षात मात्र राखाडी कॉंक्रीटचे साम्राज्य वाढतंय. आम्हाला खऱ्या अर्थाने हिरवे शहर हवे आहे, केवळ दिखावा नव्हे , अशी आर्त हाक नागरिकांनी दिली.
"ठाण्यात पूर्वी वड, पिंपळ, उंबर यांसारख्या स्थानिक झाडांची समृद्ध परंपरा होती. सिमेंटच्या जंगलात ही डेरेदार झाडे नामशेष होत आहेत. हरित वारसा टिकवण्यासाठी स्थानिक प्रजातींची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे." - डॉ. प्रशांत सिनकर, पर्यावरण अभ्यासक