

ठाणे : मुंबईसह उपनगरात उन्हाच्या प्रचंड झळा बसत असून ठाण्यातही सर्वसामान्य भाजून निघत आहे. ठाण्यात सूर्य अक्षरश: आग ओकत असून ठाण्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा ३९ ते ४१ अंशांवर पोहोचला आहे. सोमवारी शहराचे तापमान हे ४१ अंशावर पोहोचले होते.
मार्च महिना सुरू होताच उन्हाचा पाराही चढू लागला असून गेल्या दहा दिवसांत शहरातील तापमानात मोठी वाढ झाली असून तापमानाचा पारा ८ अंशाने वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागानेही उष्णतेच्या लाटांचा अंदाज वर्तवला असून यानुसार, सोमवारी शहरात उष्णतेच्या लाटा जाणवत होत्या. मंगळवारीही अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
शहरात पहाटेच्या वेळी हवेत किंचित गारवा जाणवत असला तरी सकाळीच उन्हाचा चटका वाढू लागतो. दुपारपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने रस्त्यांवर वर्दळही काहीशी कमी झाल्याचे चित्र आहे. एरव्ही कमाल ३४ ते ३५ अंश सेल्सियस तापमान असणाऱ्या ठाण्यात यंदा तापमानात ८ अंशांनी वाढ झाली आहे. सध्या तापमान ३८ ते ४० अंशांदरम्यान झेपावले आहे.
गेल्या १० दिवसांत तापमानात ८ अंशांची वाढ
जानेवारी महिन्यात वातावरणात काहीसा गारवा जाणवत होता. फेब्रुवारी महिन्यात शहरातील तापमानाचा पारा ३१ अंशाच्या आतमध्ये नोंद होता. मात्र, मार्च महिना उजाडताच तापमानाचा पारा ३९ अंशावर पोहचला. सकाळी १० वाजताच उन्हाचे चटके बसत आहेत. दुपारी ४ वाजेपर्यंत हीच परिस्थिती असते. दुपारी १२ वाजताच्या सुमाराला उन्हाच्या झळा तीव्र होतात. वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढते. गेल्या दहा दिवसांत शहरातील तापमानात ८ अंशाने वाढ झाली आहे.
मे महिन्यात तापमान आणखी वाढणार
यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजेच मार्च ते मे या काळात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील आणि उष्ण दिवसांची संख्या वाढेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. हा अंदाज काहीसा खरा ठरताना दिसत आहे.
असे वाढत गेले तापमान
२६ फेब्रुवारीला कमाल तापमान ३२.४, तर किमान तापमान २३ अंश इतके नोंदवले होते. २७ आणि २८ फेब्रुवारीला कमाल तापमान ३१ आणि किमान तापमान २२ अंश इतके होते. मार्च महिना उजाडताच तापमानात वाढ झाली. १ मार्चला कमाल तापमान ३३.४, तर किमान तापमान २२.१ अंश, २ मार्चला कमाल तापमान ३४.५ होते. दिवसेंदिवस ते वाढत गेले.
२५ ठिकाणी पाणपोई उभारणार
शहरातील वाढत्या तापमानाचा नागरिकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेने उष्णता कृती आराखड्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. उन्हाळ्यात सिग्नलवर थांबणाऱ्या चालकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी प्रमुख चौकांमध्ये जाळीचे आच्छादन उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शहरातील २५ गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या पाणपोई सुरू केल्या जाणार आहेत.