ठाणे : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी स्पष्ट आदेश दिले असूनही गणेश आगमन आणि विसर्जनाच्या दिवशी ठाणे शहरात अवजड वाहनांची वाहतूक सुरूच असल्याचे चित्र दिसून आले. त्यातच गायमुख घाट परिसरात चार ते पाच वाहने बंद पडल्याने घोडबंदर रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला.
जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहतुकीवर बंदीचे आदेश काढले असले तरी पालघर आणि रायगड जिल्हा पोलिसांसोबतच्या समन्वयाअभावी शहरात अवजड वाहतूक सुरू राहिली. त्यामुळे ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नावापुरता ठरल्याचे चित्र उभे राहिले आहे. ठाणे शहरातून मुंबई-नाशिक आणि घोडबंदर असे महामार्ग जातात. हे मार्ग मुंबई, पालघर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर तसेच गुजरात राज्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाचे मानले जातात. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. त्यातच शहरातील स्थानिक वाहनेही मोठ्या प्रमाणात धावत असतात. सध्या या मार्गांवर मेट्रो प्रकल्प उभारणीचे काम सुरू आहे. तसेच घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्याने कोंडीत अधिक भर पडत आहे. नियमाप्रमाणे अवजड वाहनांना शहरातून रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेतच परवानगी आहे. मात्र या वेळांव्यतिरिक्तही अवजड वाहतूक सुरू असल्याने वाहतूककोंडी होऊन नागरिक हैराण झाले आहेत.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत रहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी महत्त्वाचे आदेश दिले होते. गणेश आगमन व विसर्जनाच्या दिवशी शहरात अवजड वाहनांना बंदी घालावी, असे त्यांनी स्पष्ट निर्देश पोलीस प्रशासन व वाहतूक विभागाला दिले होते. तरीही रविवारी पाच दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी शहरात अवजड वाहतूक सुरूच असल्याचे स्पष्ट झाले. गायमुख घाट परिसरात चार ते पाच अवजड वाहने दिवसभरात बंद पडल्याने घोडबंदर मार्ग ठप्प झाला. त्यामुळे कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक झाली. सोमवारी सकाळीही शहरात अवजड वाहतूक अवेळी सुरू होती. कापुरबावडी उड्डाणपुलावर एक वाहन बंद पडल्याने त्यातील साहित्य दुसऱ्या वाहनात टाकावे लागले. त्यामुळे काही काळ कोंडी झाली. तसेच कशेळी-काल्हेर मार्गावरही वाहतूककोंडी झाली.
पालघर आणि रायगड जिल्ह्यातून अवजड वाहने रविवारी गणपती विसर्जनाच्या दिवशी ठाणे शहराच्या दिशेने सोडण्यात आली होती. ही वाहने शहरात आल्यानंतर रोखून धरल्यास वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होऊ शकते. त्यामुळे त्यांची शहरातून वाहतूक सुरू राहिली. त्यातच गायमुख भागात दिवसभरात तीन ते चार अवजड वाहने बंद पडल्याने कोंडी झाली.
पंकज शिरसाट, पोलीस उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा
ठाणे शहरात दीड, सात आणि दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाची संख्या मोठी असते. त्याच्या तुलनेत पाच दिवसांच्या गणपती विसर्जनाची संख्या कमी आहे. तसेच रविवारी पावसामुळे मिरवणुकांची संख्या कमी झाली होती. तरीही अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे शहरात वाहतूककोंडी झाली होती.