

ठाणे : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेने सी-१ (अतिधोकादायक) श्रेणीतील ९१ इमारतींची यादी जाहीर केली असून, त्यापैकी ४२ इमारतींमध्ये अद्याप नागरिक वास्तव्यास आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ८५२ नागरिक राहत असल्याने संभाव्य दुर्घटनांचा धोका कायम असून, महापालिकेने अशा इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने तयार केलेल्या २०२६-२७ च्या अहवालानुसार शहरातील ९१ इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. यापैकी ५१ इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून केवळ दोन इमारतींवर निष्कासन अथवा पाडकामाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, ४२ इमारतींमध्ये अजूनही रहिवासी राहत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. अहवालानुसार, नौपाडा-कोपरी प्रभाग समिती हद्दीत सर्वाधिक ५२ अतिधोकादायक इमारती आहेत. त्यापैकी २४ इमारतींमध्ये अद्याप नागरिक वास्तव्यास आहेत. याशिवाय लोकमान्यनगर-सावरकरनगर परिसरात १६, वर्तकनगरमध्ये १४, माजीवडा-मानपाडा व उथळसर येथे प्रत्येकी ११, कळवा येथे ८, तर मुंब्रा आणि दिवा येथे प्रत्येकी तीन अतिधोकादायक इमारतींची नोंद करण्यात आली
५१ इमारती रिकाम्या, केवळ दोन पाडल्या
महापालिकेने आतापर्यंत ५१ इमारतींची तपासणी करून त्या रिकाम्या केल्या आहेत. मात्र, केवळ दोन इमारतींवर पाडकामाची कारवाई करण्यात आली आहे. काही रहिवाशांनी स्वेच्छेने घरे रिकामी केली असली तरी अनेक ठिकाणी स्थलांतरास विरोध होत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वीजेसह पाणीपुरवठा खंडित करण्याची तयारी
अद्याप रिकाम्या न झालेल्या ४२ इमारतींचा वीज व पाणीपुरवठा बंद करण्यासाठी महापालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी महावितरण आणि टोरेंट पॉवर कंपनीला वीजपुरवठा खंडित करण्याबाबत पत्र पाठविण्यात आले असून, पाणीपुरवठा विभागालाही नळजोडण्या बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संबंधित प्रभाग अधिकाऱ्यांना अतिधोकादायक इमारतींवर सातत्याने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.