

ठाणे : मुंबईहून ठाण्यात जेईई कोचिंगसाठी आलेला १६ वर्षीय विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना प्रकाशात आली आहे. या अल्पवयीन मुलाला कोणीतरी फुस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेपत्ता मुलगा मुंबईत कुटुंबासह राहत असून तो नवी मुंबईतील एका महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेतो. तसेच तो दररोज सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत ठाण्यातील जेईई कोचिंग क्लासला येत असे. १३ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे सकाळी क्लाससाठी घरातून निघाला. मात्र संध्याकाळपर्यंत घरी न परतल्याने पालकांनी त्याचा मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने फोन उचलला नाही. चिंतेने पालक थेट क्लासमध्ये गेले, पण तेथे तो सापडला नाही.
पुढील दिवशी १४ नोव्हेंबर रोजी याबाबत क्लासमध्ये विचारणा केली असता, तो १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अंदाजे ११ वाजता क्लासमधून बाहेर पडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पालक व नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलाचा काहीही ठावठिकाणा लागला नाही. शेवटी पालकांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तींनी अल्पवयीन मुलाला फुस लावून पळवून नेल्याचा संशय नोंदवून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन य ांच्य T मार्गदर्शनाखाली सुरू आहे.