ठाणे : मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक नाले, गटारे आणि मॅनहोल तुंबून रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ आणि कचरा रस्त्यावर आल्याचे तसेच विविध भागांत वृक्ष व फांद्या कोसळल्याचे चित्र दिसून आले. मात्र, पावसाने काहीशी उसंत घेतल्यानंतर ठाणे महापालिकेने स्वच्छता आणि आपत्ती व्यवस्थापनाची कामे युद्धपातळीवर हाती घेतली आहेत.
महापालिकेने अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून शहरातील नाले, गटारे आणि मॅनहोलची साफसफाई सुरू केली आहे. प्रत्येक मॅनहोल उघडून त्यातील कचरा आणि गाळ बाहेर काढण्याचे काम सुरू असून, रस्त्याच्या कडेला पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्याची मोहीमही वेगाने राबविण्यात येत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेत वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात शहरात ६०० हून अधिक वृक्ष कोसळल्याची नोंद झाली असून, एका नागरिकाचा मृत्यूही झाला आहे.
परिमंडळनिहाय स्वतंत्र समन्वय पथकाची नियुक्ती
या पथकांमध्ये अभियंते, वृक्ष प्राधिकरण विभाग तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके वृक्ष छाटणीच्या कामांवर देखरेख ठेवणे, छाटलेल्या फांद्यांचे तातडीने स्थलांतर करणे, वादळी वाऱ्यामुळे पडलेले वृक्ष हटविणे तसेच मान्सूनमुळे निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर त्वरित उपाययोजना करणार आहेत. याशिवाय, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय राखून नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी परिमंडळनिहाय स्वतंत्र समन्वय पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे मान्सून काळातील आपत्कालीन परिस्थितीला अधिक प्रभावीपणे सामोरे जाण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू झाला आहे.