

ठाणे : ठाण्यात शिंदेसेनेने ७५ जागा मिळवत पुन्हा एकदा ठाण्यात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र दुसरीकडे युतीत लढलेल्या भाजपला २८ जागा मिळाल्यानंतर ठाण्याचे महापौरपद दोन वर्षांसाठी हवे आहे. तशी इच्छा भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने वरिष्ठांकडे कळविली आहे. बहुमताचा आकडा पार करणाऱ्या शिंदेसेनेने महापौरपदावर दावा सांगताच भाजपनेही या पदासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे.
या निवडणुकीत शिंदेसेना ७५ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला, तर भाजपने २८ जागा जिंकत दुसरा क्रमांक पटकावला. निकालानंतर शिंदेसेनेचाच महापौर होणार, अशी चर्चा सुरू असतानाच भाजपने दोन वर्षांसाठी महापौरपद देण्याची मागणी करत शिंदेसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. मुंबईनंतर आता ठाण्यातही महापौरपदावरून युतीत रस्सीखेच सुरू होणार का? अशी चर्चा या निमित्ताने निर्माण झाली आहे.
आमदार निरंजन डावखरे यांनी उघडपणे महापौरपदावर दावा करत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ठाणेकरांना दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी भाजपकडे महापौरपद असणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच ही मागणी मान्य न झाल्यास भाजप पारदर्शक प्रशासनासाठी चौकीदाराची भूमिका बजावेल, असा सूचक इशाराही त्यांनी दिला आहे.
शिंदे सेनेची सावध प्रतिक्रिया
ठाणे महापालिकेतील निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतील, असे शिंदेसेनेचे नेते तथा खासदार नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले. निरंजन डावखरे हे भाजपचे प्रमुख नेते असल्याने आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना अधिकाधिक पदे मिळावीत, यासाठी त्यांनी ही मागणी मांडल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर शिवसेनेचाच बसेल, मात्र भाजपचा महापौर बसेल का, याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.