ठाण्यातील पाणीटंचाईबाबत ठोस कृती आराखडा तयार करा; पाणी व्यवस्थापनाबाबत महापौरांचे निर्देश

एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये यासाठी साठा व्यवस्थापन, गळती नियंत्रण, दुरुस्ती कामे, टँकर नियोजन आणि पर्यायी स्रोतांचा वापर याबाबत ठोस कृती आराखडा तयार करण्याचे आदेश महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी दिले.
ठाण्यातील पाणीटंचाईबाबत ठोस कृती आराखडा तयार करा; पाणी व्यवस्थापनाबाबत महापौरांचे निर्देश
ठाण्यातील पाणीटंचाईबाबत ठोस कृती आराखडा तयार करा; पाणी व्यवस्थापनाबाबत महापौरांचे निर्देश
Published on

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील काही भागांत जाणवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापौर शर्मिला रोहित पिंपळोलकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतरची पहिलीच पाणीपुरवठा आढावा बैठक घेऊन नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला प्राधान्य दिले. शहरातील पाणीटंचाईचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. ज्या भागांत समस्या अधिक तीव्र आहे, त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महापौरांनी दिले.

एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाई तीव्र होऊ नये यासाठी साठा व्यवस्थापन, गळती नियंत्रण, दुरुस्ती कामे, टँकर नियोजन आणि पर्यायी स्रोतांचा वापर याबाबत ठोस कृती आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच शहरातील अनधिकृत टँकर माफियाविरोधात कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले. महापौर दालनात पार पडलेल्या या बैठकीस नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, उपनगरअभियंता विकास ढोले तसेच कार्यकारी अभियंता उपस्थित होते. शहरात दररोज किती टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो, त्याचे नियोजन, खर्च आणि पारदर्शकतेबाबत सविस्तर माहिती सादर करण्यास सांगण्यात आले.

बैठकीत बृहन्मुंबई महानगरपालिका कडे ५० एमएलडी वाढीव पाणीपुरवठ्याची केलेली मागणी आणि त्याऐवजी मिळालेल्या केवळ ५ एमएलडी पाण्याचा मुद्दा गांभीर्याने मांडण्यात आला. उर्वरित पाणी मिळविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय पावले तातडीने उचलून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात सोमवारी (१६ फेब्रुवारी) बृहन्मुंबई महानगरपालिकेत ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती नगर अभियंत्यांनी दिली.

जुन्या कूपनलिकांची तातडीने दुरुस्ती करावी

कळवा, मुंब्रा व दिवा या भागात एमआयडीसीमार्फत पाणी घेऊन ठाणे महापालिकेद्वारे वितरण केले जाते. या भागात पाणी आठ ते दहा दिवसांनी उपलब्ध होत असल्याच्या तक्रारींवर महापौरांनी गंभीर चिंता व्यक्त केली. ठाणे शहरासाठी आवश्यक त्या ठिकाणी निविदा मंजूर असून तातडीने काम सुरू करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पर्यायी स्रोतांचा वापर करण्याचे निर्देश

आदिवासी पाड्यांमध्ये नियमित व मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. आवश्यक असल्यास अतिरिक्त टँकर किंवा पर्यायी स्रोतांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले. घोडबंदर परिसरासाठी टंचाई दूर करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in