मनोरुग्णांनी जवानांच्या हाती बांधला देशप्रेमाचा धागा; ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील महिलांकडून ५०० राख्या

रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा धागा... पण याच प्रेमाच्या धाग्याला जेव्हा देशसेवेची भावना जोडली जाते, तेव्हा त्याला एक वेगळेच मोल प्राप्त होते.
मनोरुग्णांनी जवानांच्या हाती बांधला देशप्रेमाचा धागा; ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील महिलांकडून ५०० राख्या
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : रक्षाबंधन म्हणजे भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा धागा... पण याच प्रेमाच्या धाग्याला जेव्हा देशसेवेची भावना जोडली जाते, तेव्हा त्याला एक वेगळेच मोल प्राप्त होते. प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे येथील महिला मनोरुग्णांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या ५०० राख्या सीमेवरील जवानांसाठी पाठवून रक्षाबंधनाचा हा पवित्र धागा थेट देशाच्या रक्षणकर्त्यांपर्यंत पोहोचवला आहे.

आम्ही शिवभक्त परिवार या संस्थेच्या माध्यमातून हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी अत्यंत प्रेमाने आणि उत्साहाने या राख्या तयार केल्या. त्यांच्या हातातील प्रत्येक राखीत रंगीत धाग्यांसोबतच जवानांप्रति आदर, कृतज्ञता आणि देशासाठी काहीतरी करण्याची मनापासूनची भावना गुंफलेली होती.

रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुखसमृद्धीची आणि सुरक्षिततेची कामना करते. मात्र, या महिलांनी आपल्या भावंडांबरोबरच देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या हजारो जवानांना आपला भाऊ मानून त्यांच्या मनगटासाठी राख्या तयार केल्या. देशाच्या रक्षणासाठी घरापासून दूर असलेल्या जवानांपर्यंत प्रेमाचा हा धागा पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न मनाला स्पर्शून जाणारा ठरला.

देशभक्तीची भावना एकच

सीमेवर बंदूक हातात घेऊन देशाचे रक्षण करणारे जवान आणि त्यांच्या मनगटासाठी प्रेमाने राखी तयार करणाऱ्या या महिला दोघांचे कार्य वेगळे असले, तरी देशप्रेमाची भावना मात्र एकच आहे. या राख्या तयार करून घेण्यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. जानवी केरझरकर व डॉ. आश्लेषा कोळी आदींनी अथक परिश्रम घेतले.

त्यांनाही देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ

समाजात अनेकदा मनोरुग्णांकडे केवळ त्यांच्या आजाराच्या नजरेतून पाहिले जाते. मात्र, या उपक्रमाने हीच धारणा बदलणारा सुंदर संदेश दिला आहे. मनोरुग्णांच्या मनातही प्रेम आहे, माया आहे, संवेदना आहेत आणि आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची तळमळही आहे. संधी आणि प्रोत्साहन मिळाले, तर तेही समाजासाठी आनंदाने योगदान देऊ शकतात.

या महिलांनी तयार केलेल्या राख्यांमधून त्यांची देशाबद्दलची आपुलकी आणि जवानांप्रति कृतज्ञता दिसून येते. मानसिक आजार असलेल्या व्यक्तींमध्येही संवेदना, कौशल्य आणि सामाजिक योगदानाची क्षमता असते, हा संदेश या उपक्रमातून समाजाला मिळतो.

डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय, ठाणे

logo
marathi.freepressjournal.in