
ठाणे : दररोजच्या तीव्र वाहतूककोंडीत ठाणेकर त्रस्त असताना, ठाणे काँग्रेसने फडणवीस सरकारवर थेट आरोप केला आहे की मेट्रो प्रकल्पाचा गाजावाजा फक्त निवडणुकीसाठी केला जात आहे. प्रत्यक्षात प्रकल्प अजूनही अधूरा असून नागरिकांचा त्रास कायम असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.
ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, फडणवीस सरकार जनतेसाठी मेट्रो सुरू करण्याची तयारी न करता, फक्त प्रचारासाठी चाचणी घेत आहे. ही खरी चाचणी नाही, तर निवडणुकीसाठीचा राजकीय खेळ आहे.
काँग्रेसच्या मते, २०१२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भूमिगत मेट्रो प्रकल्पाची घोषणा केली होती, तर २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, अद्याप मेट्रो मार्गिका अपूर्ण असून पिलर्स, कारशेड, स्टेशन व बोगींची कामे अर्धवट आहेत. तिकीट काऊंटर, शौचालये व कॅफेटेरियासारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाहीत. खर्च कोट्यवधींनी वाढला असतानाही नागरिकांना आराम नाही, असा काँग्रेसचा आरोप आहे.
स्थानिक नागरिकांच्या विरोधाला न जुमानता महापालिकेने सेवा रस्त्याचे एकत्रीकरण सुरू ठेवल्याचा आरोप त्यांनी केला. स्वर्गीय काँग्रेस नेते बाळकृष्ण पुर्णेकर यांनी नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र सेवा रस्त्याची सातत्याने मागणी केली होती, तरी सरकारने जनतेचा विश्वास न घेता काम सुरू ठेवले. जर सरकारने सेवा रस्त्याचे एकत्रीकरण तातडीने थांबवले नाही आणि मेट्रो प्रकल्पाबाबत स्पष्ट श्वेतपत्रिका जारी केली नाही, तर काँग्रेस जनहित याचिका दाखल करून मोठे जनआंदोलन उभारेल.
विक्रांत चव्हाण, अध्यक्ष ठाणे काँग्रेस
काँग्रेसने ठामपणे सांगितले की, “मेट्रो प्रकल्पाच्या नावाखाली फडणवीस सरकारने ठाणेकरांना फसवले आहे. काम रखडलेले असून खर्च वाढला आहे. जनतेसाठी प्रत्यक्ष काम न करता फक्त निवडणुकीसाठी गाजावाजा करणारे धोरण ठाणेकरांना मान्य होणार नाही.