
ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षभरात ११०० पेक्षा अधिक अपघात झाले असून या अपघातांमध्ये २१५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू हे दुचाकीस्वारांचे झाल्याचे समोर आले आहे. अपघात होण्यामागे ओव्हर स्पीड, खड्डे, विविध प्रकारची रस्त्यांची सुरू असलेली कामे तसेच वाहतुकीचे नियम न पाळणे, अशी कारणे समोर आली आहे. विशेष म्हणजे ठाण्यात आणि विशेष करून घोडबंदर पट्ट्यात ब्लॅक स्पॉटची संख्या देखील वाढली असल्याने वाहने सांभाळून चालवण्याचे आवाहन ठाणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरातील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि रुंद रस्त्यांमुळे वाहनांची गती वाढली आहे. तर दुसरीकडे रस्त्यांची विविध कामे सुरू असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांचीही संख्या वाढलेली आहे त्यामुळे. अंतर्गत रस्त्यांवरही अपघात होऊ लागले आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत झालेले अपघात गेल्या वर्षाच्या एकूण अपघातांपेक्षा जास्त आहेत. गंभीर अपघातामध्ये सर्वाधिक संख्या दुचाकी चालविणाऱ्यांची असून हेल्मेटचा वापर न करणाऱ्या दुचाकीस्वारांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. एकूण १०५२अपघातांमध्ये तब्बल ६२५ अपघात दुचाकीस्वारांचे आहे.
ठाण्यातील ब्लॅक स्पॉट
मानकोली नाका, दिवागाव, खारीगांव पूल, कशेळी पूल, पिंपळास फाटा, धामणकर नाका, राजनोली नाका, ब्रह्मांड सिग्नल, माजिवडा, गायमुख, ओवळा सिंग्नल, वाघबीळ, कोपरी पूल, कल्याण फाटा, शीळ फाटा, तीन हात नाका, नितीन नाका, ऑर्डनन्स फॅक्टरी, वॉलधूनी पूल, आनंदनगर, रेती बंदर, विजय सेल्स घोडबंदर रोड, खारीगाव टोल नाका, टाटा नाका, विको नाका.
‘ब्लॅक स्पॉट’ सर्वात जास्त धोकादायक
चुकीच्या दिशेने दुचाकी चालवणे, हेल्मेट न वापरणे, टायरची काळजी न घेणे आणि सर्वात धोकादायक म्हणजे ब्लाइंड स्पॉट परिसरात वाहन चालवले जात असल्याने अपघाताची संख्या वाढत असल्याचे पोलीस प्रशासनाचे म्हणणे आहे. रस्ता ओलांडणाऱ्या, दुचाकीस्वारांसाठी सर्वात जास्त धोकादायक स्पॉट हे ‘ब्लॅक स्पॉट’ असतात, ९० टक्के मृत्यू या स्पॉटमुळे होतात. ट्रक चालवताना ट्रकचालकांना हे स्पॉट दिसून येत नाहीत. ट्रकचालकाला सुमारे दहा फुटापर्यंत त्याच्या वाहनासमोर कोण आहे हे दिसत नाही. ट्रकच्या मागे काही फुटाच्या अंतरावर असलेले वाहन, व्यक्ती ट्रकचालकाला आरशात दिसून येत नसल्याने अपघात होत असतात.
याठिकाणी सर्वाधिक अपघात
कापुरबावाडी येथील माजिवडा ‘ब्लॅक स्पॉट’ गंभीर अपघातांसाठी सर्वाधिक धोकादायक असल्याचे अपघातांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अकरा महिन्यांत या ठिकाणी २५ अपघात झाले असून त्यामध्ये १२ गंभीर आणि ५ किरकोळ अपघातांचा समावेश आहे. त्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला असून सर्वाधिक दहा जणांचा नारपोली येथील माणकोली नाका या ब्लॅक स्पॉटवर झाले आहे. तर ठाणे शहर वाहतूक हद्दीतील २५ ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी झालेल्या गंभीर अपघातात एकूण ५९ जणांचा जीव गेला आहे.
बाईक चालवताना काय काळजी घ्याल ?
ओलांडताना दोन्ही बाजूला पाहून मोटार गाडी दहा फुटांच्या अंतरावर असताना रस्ता ओलांडू नये अथवा त्याच्या आसपास येऊ नये, धावत्या ट्रकच्या मागोमाग जवळच्या अंतरावर वाहन चालवू नये. ही ठिकाणे ट्रकचालकाला आरशात दिसून येत नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे देखील वाहतूक विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२४
अपघात -११००
झालेले मृत्यू -२१५
मागील वर्षी झालेले मृत्यू -१८४
गंभीर अपघात
मागील वर्षी- ५३०
यावर्षी- ५५७
किरकोळ अपघात
गेल्या वर्षी- २४१
यावर्षी- २७९