

ठाणे : यंदाच्या उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नैसर्गिक जलस्रोतांचा प्रभावी वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील कुपनलिकांची दुरुस्ती व पडताळणी तसेच विहिरींच्या पाण्याचा पुनर्वापर करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
महापालिका हद्दीतील एकूण १,९६० कुपनलिकांची सखोल पडताळणी करण्यात येणार असून आवश्यक त्या कुपनलिकांची दुरुस्ती केली जाणार आहे. या कामासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून १२ फेब्रुवारी रोजी निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. स्थायी समिती गठित झाल्यानंतर प्रस्ताव त्यांच्या अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची बचत साधण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा जास्तीत जास्त वापर महापालिकेचा हा प्रयत्न असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या शहरात ९७७कुपनलिकांद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. यातील पाणी मुख्यतः वाहन धुणे व इतर घरगुती कामांसाठी वापरले जाते. तसेच ४०४ कुपनलिकांद्वारे सार्वजनिक शौचालये, २२४ कुपनलिकांद्वारे उद्याने आणि ३५५ कुपनलिकांद्वारे महापालिकेच्या विविध इमारतींना पाणीपुरवठा केला जातो. पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी या पर्यायी स्रोतांचा याशिवाय शहरातील विहिरींच्या पाण्याचाही पुनर्वापर करण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. वापर अधिक प्रभावीपणे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कपडे धुणे, भांडी स्वच्छ करणे, शौचालये, बागकाम आदी कामांसाठी विहिरींचे पाणी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होण्यास मदत होणार आहे.
विहिरींच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष
ठाणे शहरात सध्या एकूण ५५५ विहिरी असून त्यापैकी ३५० विहिरी महापालिकेच्या मालकीच्या, तर २०५ विहिरी खासगी मालकीच्या आहेत. विहिरींची दुरुस्ती, स्वच्छता आणि गाळ काढण्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. दरम्यान, काही खासगी विहिरी दूषित झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा विहिरींच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. महापालिकेने यापूर्वी २५ विहिरींच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. त्यापैकी १० विहिरींची दुरुस्ती पूर्ण झाली असून - उर्वरित १५ विहिरींची कामे लवकरच सुरू होणार आहेत.