
ठाणे : सध्या चीनमध्ये एचएमपीव्ही साथीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत. भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. तो श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरतो. हा एक हंगामी रोग असून तो सामान्यतः फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाण्याचे तसेच आरोग्य विभागाला सर्तक राहण्याचे निर्देश आयुक्तांनी केले आहे.
ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या विषाणूबाबत, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाच्या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार, २०२३च्या तुलनेत डिसेंबर-२०२४ मध्ये या आराजाच्या रुग्णात कोणतीही वाढ झालेली नाही. तरीही, खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांना श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये या संदर्भातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
केडीएमसीमार्फत जनजागृती
एचएमपीव्ही विषाणूपासून बचाव करण्यासाठी काय करावे, काय करू नये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत कडोंमपा कार्यक्षेत्रातील जनतेला सूचित करण्यात आले आहे. हा एक हंगामी आजार आहे. जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला उद्भवतो. संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांपर्यंत असतो. कल्याण-डोंबिवली महानगरपालिके अंतर्गत याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याप्रकरणी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब नजीकच्या दवाखान्यात, रुग्णालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. दीपा शुक्ल, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, यांनी केले आहे.