
ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात कळवा, मुंब्रा व दिवा परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी राज्य शासन विविध प्रयत्न करीत आहे. काळू धरण पूर्ण होईपर्यंत पर्यायी उपाययोजनांचा अवलंब करून या समस्येवर मात करण्यात येईल. काळू धरण पूर्ण करण्यात येऊन ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील मुंब्रा, कळवा परिसरातील पाणीटंचाईबाबत सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात अधिक माहिती देताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ठाणे महापालिका क्षेत्रातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधीची कमतरता होऊ देणार नसल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
कळवा, मुंब्रा, दिवा भागासाठी ५० एमएलडी ते संपूर्ण ठाणे महानगराकरिता १०० एमएलडी पाण्याच्या प्रस्ताव महापालिकेने दिला होता, त्यावर कार्यवाहीचे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला दिले आहेत. तसेच एमआयडीसीच्या बारवी धरणातून महानगराला पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त ५० दशलक्ष लिटर पाणी मागणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आली आहे.
नगरोत्थानमधून २४० कोटी रुपयांची तरतूद
ठाणे महापालिका व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंब्रा, कौसा व कळवा भागात प्रतिदिन १३०.५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा पूर्ण दाबाने होण्यासाठी या भागात सहा जलकुंभांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामध्ये दोन जलकुंभ कार्यान्वित करण्यात आले असून उर्वरित चार जलकुंभ कार्यान्वित होण्यासाठी वितरण जलवाहिनी टाकण्याचे काम प्रगतिपथावर आहे. पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी रिमोल्डिंग प्रकल्प राबविण्यात येत आहे. यासाठी शासनाने नगरोत्थानमधून २४० कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.
दै.‘नवशक्ति’चा पाठपुरावा
ठाणे शहराला भेडसावत असणाऱ्या तीव्र पाणीटंचाई संदर्भात ‘काळू धरणाचे घोंगडे भिजतच’ हा लेख दै. ‘नवशक्ति’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. दै. ‘नवशक्ति’ने या वेळोवेळी काळू धरण होणे गरजेचे असल्याबद्दल पाठपुरावा केला होता.
अवैधरीत्या नळजोडण्या करणाऱ्यांवर कारवाई
एमआयडीसी विटावा भागात रात्री १२ ते ५ यावेळी पाणीपुरवठा बंद करते. या भागात पाणीटंचाई दूर करण्यासाठी अतिरिक्त जलवाहिनीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण होईपर्यंत रात्री १२ ते ५ या कालावधीत पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात येईल. ठाणे महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर अवैधरीत्या नळजोडण्या घेण्यात आल्या असतील, तर याबाबत तातडीने चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला.