

ठाणे : ठाण्याच्या पोखरण रोड क्रमांक २ येथील हनुमान मंदिराजवळ घडलेल्या खूनप्रकरणाचा छडा लावत वागळे गुन्हे शाखा युनिट-५ ने अवघ्या २४ तासांत दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. रेल्वेने उत्तर प्रदेशकडे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना कसारा रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले.
वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दीपक जयस्वार (२३) या तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला होता. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अजय देवकीलाल गिरी (२८) आणि शिवा संजय गोस्वामी (२५) या दोघांचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान पोलिसांनी कसारा रेल्वे स्थानक येथे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या १३ संशयितांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील आरोपी आणि मृत हे खासगी बसवर चालक आणि क्लिनर म्हणून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.