Thane : पॉड टॅक्सीची मोनोरेल होऊ देऊ नका; सुरक्षितता-‌व्यव‌हार्यता तपासण्याच्या प्रताप सरनाईकांच्या सूचना

घोडबंदर परिसरात मुख्य मेट्रो व अंतर्गत मेट्रोला जोडण्यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्याचे सादरीकरण ठाणे महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च सुमारे १,००० कोटी रुपये असून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत याची माहिती देण्यात आली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : घोडबंदर परिसरात मुख्य मेट्रो व अंतर्गत मेट्रोला जोडण्यासाठी पॉड टॅक्सी प्रकल्प राबविण्याचे सादरीकरण ठाणे महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाचा खर्च सुमारे १,००० कोटी रुपये असून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत याची माहिती देण्यात आली. या वेळी सरनाईक यांनी मोनोरेलप्रमाणे प्रवाशांची अवस्था होऊ नये, सुरक्षितता आणि आर्थिक व्यवहार्यता तपासल्यानंतरच आराखडा तयार करावा, अशा सूचना संबंधित कंपनीला दिल्या.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या कामांचा आढावा परिवहन मंत्री सरनाईक यांनी घेतला. यावेळी पॉड टॅक्सीचे सादरीकरण करण्यात आले. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे. परंतु तिथपर्यंत पोहचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे.

एकावेळेस १६ प्रवाशांची वाहतूक

ही टॅक्सी हवेत तरंगती स्वरूपात चालणार आहे. तिचा ताशी ६० ते ७० किमी एवढा असणार आहे. यातून एकावेळेस उभे आणि बसून १६ प्रवासी जाऊ शकतात. ज्या प्रवाशांना ज्या स्थानकापर्यंत जायचे असेल त्याठिकाणीच ही टॅक्सी थांबणार आहे. संपूर्णपणे इलेक्ट्रीकवर ही टॅक्सी धावणार आहे. यासाठी सिमेंटचे गर्डर असणार असून याचे व्हिल आणि ट्रॅक हे स्टीलचे असणार असल्याची माहिती यावेळी संबधींत कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली. पहिल्या टप्यात भाईंदर पाडा ते कापुरबावडीपर्यंत ही सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रकल्पाला आमचा विरोध नाही

सादरीकरणानंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले की, पीपीपी तत्त्वावरील या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. मात्र केंद्र सरकारकडून मान्यता घेणे गरजेचे आहे तसेच राज्य शासनाच्या ‘मित्रा’ संस्थेकडेही सादरीकरण अपेक्षित आहे. प्रकल्प यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करावी लागतील. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट महापालिकेला सादर करावा लागेल आणि त्यानंतर महासभेत व राज्य सरकारकडे प्रस्ताव नेला जाईल.

लोकांना त्रास होता कामा नये

प्रताप सरनाईक म्हणाले की, पीपीपी तत्त्वावरील हा प्रकल्प चांगला असला तरी मोनोरेलप्रमाणे त्याची अवस्था होऊ नये. जागेअभावी प्रकल्प राबविणे कठीण आहे, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यतेला प्राधान्य देऊन आराखडा तयार करूनच पुढे जावे. लोकांना त्रास होता कामा नये, याची विशेष दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in