

ठाणे : कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलमधून उडी मारून आत्महत्या केलेल्या विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी आठ महिन्यांनंतर नवे वळण आले आहे. प्रसूतीनंतर ‘पोस्टपार्टम सायकोसिस’ या गंभीर मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या शिखा हिला मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तिचा पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारदार सुरेश जैन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, डॉक्टरांनी शिखाला एकटे न सोडण्याचा आणि नियमित उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ‘डिसेंबरपर्यंत बरी झाली नाहीस तर माहेरी सोडून देऊ’ तसेच ‘घटस्फोट देऊ’ अशा धमक्या देत तिचा सातत्याने मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप आहे. या त्रासामुळे नैराश्यात गेलेल्या शिखाने १० नोव्हेंबर २०२५ रोजी धावत्या लोकलमधून उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला अपमृत्यूची नोंद असलेल्या या प्रकरणात सीसीटीव्ही तपासानंतर आत्महत्या स्पष्ट झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक धर्मेंद्र आवारे यांनी दिली.