Thane : आरटीई पोर्टलवरील ;१ किमी' अट तत्काळ हटवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

आरटीई प्रवेशासाठी उच्च न्यायालयाने १ किमी अट रद्द करून ३ किमीपर्यंत शाळांची निवड करण्याची मुभा दिली आहे. मात्र आरटीई पोर्टलवर अद्याप बदल न झाल्याने अनेक गरीब विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांना निवेदन दिले.
Thane : आरटीई पोर्टलवरील ;१ किमी' अट तत्काळ हटवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
Thane : आरटीई पोर्टलवरील ;१ किमी' अट तत्काळ हटवा; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा; शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
Published on

ठाणे : आरटीई प्रवेशासाठी उच्च न्यायालयाने १ किलोमीटर अंतराची अट रद्द करून पालकांना ३ किलोमीटरपर्यंतच्या शाळांची निवड करण्याची मुभा दिली असतानाही अधिकृत आरटीई पोर्टलवर अद्याप आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आलेले नसल्याने अनेक गरीब व गरजू विद्यार्थ्यांचे प्रवेश धोक्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेऊन पोर्टलमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.

तसेच पुढील १२ तासांत पोर्टलवरील अंतराच्या निकषात दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा राजेश कदम यांनी दिला.

आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कार्याध्यक्ष राजेश कदम व मिलिंद बनकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी आरटीई प्रवेश प्रक्रियेत उद्भवलेल्या अडचणींबाबत निवेदन देण्यात आले. नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार आरटीई प्रवेशासाठी राज्य सरकारने लागू केलेली १ किलोमीटरची अट स्थगित करण्यात आली असून पालकांना ३ किलोमीटरपर्यंतच्या शाळांची निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र १३ मार्चपर्यंतही आरटीईच्या पोर्टलवर जुनीच अट दिसत असल्याने शाळा निवडताना पालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

दरम्यान, वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्याने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक कार्यवाही करावी. अन्यथा विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हितासाठी पुढील काळात तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला. यावेळी बाळेश हत्तिअंबिरे, विश्वास चव्हाण, सचिन भातंबरे आणि साहिल उदुगडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रशासनाची भूमिका

आरटीई प्रवेशाच्या काही मुद्द्यांबाबत ठाणे महापालिकेचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे यांची भेट घेण्यात आली. आम्ही मांडलेल्या सर्व मुद्द्यांबाबत त्यांनी सकारात्मकता दाखवत मुद्दे सविस्तरपणे लिहून घेतले असून विभागीय साप्ताहिक बैठकीत हे विषय मांडणार असल्याचे सांगितले. तसेच नवीन नियम आणि तारखांबाबत महानगरपालिकेतर्फे बॅनर लावून जनजागृती करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले, अशी माहिती राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी दिली.

शिक्षणाधिकारी बडे साहेब यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. न्यायालयाने आरटीई प्रवेशासाठी १ किमीऐवजी ३ किमी अंतराची अट मान्य केली आहे. मात्र राज्य शासनाच्या पोर्टलवर ती अद्याप अपडेट झालेली नाही. त्यामुळे पालकांचे तीन दिवस वाया गेले आहेत. त्यामुळे १८ मार्चची मुदत २५ मार्चपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. तसेच नवीन नियमानुसार शाळा निवडण्यासाठी अर्जात ‘एडिट’ करण्याची संधी मिळायला हवी. पालघरसारख्या ग्रामीण भागात १ किमी अंतरात शाळाच उपलब्ध नसल्याने तेथील पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. आरटीईचे नवीन नियम आणि वाढीव तारखांबाबत महानगरपालिकेतर्फे अधिकृत जनजागृती करण्यात यावी.

राजेश कदम, युवक कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)

logo
marathi.freepressjournal.in