ठाणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमाची गती अपेक्षेपेक्षा मंद असल्याचे चित्र समोर आले आहे. जिल्ह्यातील ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांपैकी आतापर्यंत केवळ २० लाख ८५ हजार ८७० मतदारांपर्यंत गणना पत्रके पोहोचली असून, हे प्रमाण अवघे २८ टक्के आहे. त्यामुळे उर्वरित ७२ टक्के काम अवघ्या १९ दिवसांत पूर्ण करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
जिल्ह्यातील १८ तालुक्यांमध्ये ६ हजार ८९२ बूथस्तरीय अधिकारी (बीएलओ) नियुक्त करण्यात आले आहेत. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओ प्रत्येक घराला भेट देऊन मतदारांना दोन प्रतींमध्ये गणना पत्रक वितरित करीत आहेत. यातील एक प्रत आवश्यक माहिती भरून मतदार किंवा स्वाक्षरीसह कुटुंबप्रमुखाच्या जागेवरच संकलित केली जात असून, दुसरी प्रत पोचपावती म्हणून मतदारांकडे ठेवली जात आहे. त्यानंतर भरलेले अर्ज बीएलओ अॅपवर अपलोड करण्याची प्रक्रियाही राबविण्यात येत आहे. या मोहिमेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन कार्यक्रमाची माहिती देण्यात आली होती.
ठाणे जिल्हा प्रशासनाकडे लक्ष
प्रत्येक बीएलओकडे सुमारे ९०० ते १,२०० मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात अनेक बीएलओ केवळ १५० ते ८०० मतदारांपर्यंतच पोहोचल्याचे दिसून येत आहे. परिणामी, संपूर्ण मोहिमेची गती मंदावली असून नियोजित मुदतीत उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला अधिक वेगाने काम करावे लागणार आहे.