ठाणे-वडपे राष्ट्रीय महामार्ग ‘खड्डेमुक्त’, एमएसआरडीसीने युद्धपातळीवर बुजवले खड्डे

गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे वडपे-ठाणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याप्रकरणी अनेक वेळा निषेध नोदंविल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे कामे हाती घेतले असून, ठाणे-वडपे राष्ट्रीय महामार्ग हा खड्डेमुक्त केला आहे.
ठाणे-वडपे राष्ट्रीय महामार्ग ‘खड्डेमुक्त’, एमएसआरडीसीने युद्धपातळीवर बुजवले खड्डे
Published on

शहापूर : गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे वडपे-ठाणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याप्रकरणी अनेक वेळा निषेध नोदंविल्यानंतर राज्य रस्ते विकास महामंडळाने युद्धपातळीवर खड्डे बुजविण्याचे कामे हाती घेतले असून, ठाणे-वडपे राष्ट्रीय महामार्ग हा खड्डेमुक्त केला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या महार्गावरील खड्डे बुजविण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले होते.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ येथील ठाणे ते वडपे या २३. ५ किमी आठ पदरी रस्त्याचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. सध्या हे काम प्रगतीपथावर असून, आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. मे २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. मुसळधार पावसामुळे या महामार्गावर खड्डे पडले असून, खड्डे बुजविण्याचे काम रात्रंदिवस तीन पाळ्यांमध्ये काम सुरू आहे. आतापर्यंत एमएसआरडीसीने या महामार्गावरील ५५ खड्डे डीबीएम मास्टिकने बुजवले आहेत. खड्डे बुजविण्याच्या कामासाठी अतिरिक्त ६ अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यासाठी खारेगाव प्रकल्प कार्यालय येथे कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून, हेल्पलाईन नंबर देण्यात आला आहे. तसेच खड्डे भरण्याची कामे सुरू असताना वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी एमएसआरडीसी कडून वाहतूक विभागाला १९० ट्राफिक वार्डन देण्यात आलेले असून त्यांना जॅकेट रेनकोट पुरविण्यात आले आहे. तसेच पावसाळ्यात वाहन ब्रेक डाऊन प्रमाण वाढत असल्याने पोलीस विभागाला ९ क्रेन पुरविण्यात आले आहेत. माणकोली व राजणोली पुलाच्या येथे हलक्या वाहनासाठी डेलिनेटर बसऊन स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे. तसेच वाहतूककोंडी होऊ नये यासाठी काँक्रीट बॅरिकेट लावून नाशिक-मुंबईसाठी स्वतंत्र मार्गिका तयार करण्यात आली आहे.

आठ पदरीचे काम प्रगतिपथावर

वडपे - ठाणे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ या चार पदरी रस्त्याचे आठ पदरी काँक्रीटीकरणाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू आहे. मुंबई -नाशिक २ पदरी सर्व्हिस रोडचे १७. ५० किमी पैकी १५ किमी काम पूर्ण झाले असून उर्वरित अडीच किमी काम जानेवारी २०२५ पर्यंत होणार आहे. नाशिक -मुंबई २ पदरी १७. ५० किमी पैकी १४. ५० किमी काम पूर्ण झाले असून उर्वरित ३ किमी काम जानेवारी २०२५ पर्यंत होणार आहे.

बहुतांशी कामांना २०२५चा मुहूर्त

मुख्य रस्त्यात चार मोठे पूल आणि १० भुयारी मार्गाचा समावेश आहे. त्यांची लांबी साधारण ८. १६४ किमी आहे. यामध्ये कळवा खाडी पुलाचे ७२ टक्के काम पूर्ण झाले असून, जानेवारी २०२५ पर्यंत हे काम पूर्णत्वास येणार आहे. रेल्वे पुलाचे ३५ टक्के काम झाले असून फेब्रुवारी २०२५ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. वडपे उड्डाणपुलाचे ३९ टक्के काम पूर्ण झाले तर कशेळी खाडीपुलाचे ६३ टक्के काम पूर्ण झाले असून या दोन्ही पुलाची कामे एप्रिल - मे २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहेत. १० भुयारी मार्गात वालशिंद भुयारी मार्गाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, पुढील महिन्यात सप्टेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. सोनाळे आणि सावली भुयारी मार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत संपणार आहे. ओवळी, दिवे गाव, दिवे या भुयारी मार्गाचे ५० ते ५५ टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारी २०२५ पर्यंत हे काम होणार आहे. तर येवई, पिपळास, माणकोली मोठागाव आणि खारेगाव या भुयारी मार्गाची कामे मे २०२५ पर्यंत पूर्णत्वास येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in