३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण

ठाणे महापालिकेला नियोजित २४ तासांच्या पाणीबंदीऐवजी ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. परिणामी, रविवार सायंकाळी पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी तो अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.
३६ तासांच्या 'बंद'नंतरही ठाण्यात कमी दाबानेच पाणी; ऐन उन्हाळ्यात पाणीबंदीने नागरिक हैराण
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

ठाणे : एकीकडे उन्हाळ्यात सूर्य आग ओकत असताना ठाणेकर नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ठाणे शहरातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे ठाणेकरांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ठाणे महापालिकेला नियोजित २४ तासांच्या पाणीबंदीऐवजी ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. परिणामी, रविवार सायंकाळी पाणीपुरवठा सुरू झाला असला तरी तो अत्यंत कमी दाबाने होत असल्याने नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीमध्ये माजिवडा परिसरात मोठी गळती आढळून आली होती. यामुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत होते. तसेच शहरातील इतर भागांतील जलवाहिन्यांमध्येही गळतीची समस्या होती. या सर्व दुरुस्ती कामांसाठी शनिवारपासून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागल्याने ही बंदी ३६ तासांपर्यंत वाढली. दुरुस्तीचे काही काम पूर्ण झाले असले तरी मुख्य जलवाहिनीतील गळती पूर्णपणे थांबविण्यात यश आलेले नाही. त्यामुळे सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येत असून पुढील एक-दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणीपुरवठा बंद राहिल्याने शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील पाण्याच्या टाक्या रिकाम्या झाल्या आहेत. काही ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा पडत आहे. झोपडपट्टी आणि चाळ भागांमध्ये साठवलेले पाणी संपल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

logo
marathi.freepressjournal.in