

ठाणे : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असताना शहरातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील साठा झपाट्याने घटून अवघ्या २८ टक्क्यांवर आल्याने बृहन्मुंबई महानगरपालिकाने १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम ठाणे शहरावरही होण्याची शक्यता असून, मुंबईकडून मिळणाऱ्या पाणीपुरवठ्यात कपात होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, यंदा पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील काळात धरणांतील पाणीसाठ्यावर अधिक ताण येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत केवळ मुंबईकडीलच नव्हे, तर इतर स्त्रोतांमधून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातही कपात होऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा मोठा भाग कोपरी आणि वागळे इस्टेट परिसरात वितरित केला जातो. जर १० टक्के कपात लागू झाली, तर या भागांतील नागरिकांना त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.
३० दशलक्ष लिटरचा तुटवडा
सध्या ठाणे महापालिका क्षेत्राला चार प्रमुख स्त्रोतांमधून दररोज सुमारे ५९० दशलक्ष लिटर पाणी मिळते. यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या योजनेतून २५० दशलक्ष लिटर, एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर, स्टेम प्राधिकरणकडून ११५ दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेकडून ९० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मात्र शहराची लोकसंख्या २७ लाखांच्या पुढे गेल्याने प्रत्यक्ष गरज सुमारे ६२१ दशलक्ष लिटर इतकी आहे. त्यामुळे आधीपासूनच सुमारे ३० दशलक्ष लिटरचा तुटवडा जाणवत आहे.
मुंबई महापालिकेने कपातीचा निर्णय घेतला असला तरी ठाण्याला होणाऱ्या पुरवठ्यात कपात करण्याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. तसेच इतर स्त्रोतांनीही कपातीचा निर्णय जाहीर केलेला नाही. मात्र, अशी परिस्थिती उद्भवल्यास शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात येईल.
- प्रशांत सोनाग्रा, नगर अभियंता ठाणे महापालिका