ठाण्यात बुधवारी पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे पालिकेचे आवाहन

ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिसे उदंचन केंद्र तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रात पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
ठाण्यात बुधवारी पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे पालिकेचे आवाहन
ठाण्यात बुधवारी पाणीपुरवठा बंद; नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरण्याचे पालिकेचे आवाहन
Published on

ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पिसे उदंचन केंद्र तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब उपकेंद्रात पावसाळ्यापूर्व आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील घोडबंदर परिसरासह विविध भागांमध्ये बुधवार, ३ जून रोजी १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.

या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमध्ये कंट्रोल पॅनल दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन तसेच इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे. ही कामे सकाळी ९ ते रात्री ९ या कालावधीत करण्यात येणार आहेत.

यासाठी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचा १२ तासांचा बंद घेण्यात येणार आहे.

या कालावधीत घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतुपार्क, जेल परिसर, गांधीनगर, रुस्तमजी, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटरनिटी जंक्शन, मुंब्रा तसेच कळवा येथील काही भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.

दरम्यान, पाणीपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in