ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली! जिल्ह्यातील बारवी, मोडकसागर धरणे १०० टक्के भरली

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणे १० टक्के भरल्याने जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे.
बारवी धरण ओव्हर फ्लो
बारवी धरण ओव्हर फ्लो
Published on

ठाणे : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणे १० टक्के भरल्याने जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटली आहे. काही दिवस विश्रांतीनंतर ठाणे जिल्ह्यात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. ठाणे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. ऑगस्ट महिन्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे भरली आहेत. सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील मोडकसागर आणि बारवी ही दोन धरणे १०० टक्के भरली आहेत. भातसा आणि तानसा ही दोन धरणे ९५ टक्यांच्या वर भरली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील बहुतांश भागाला बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यात ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर या महापालिकांसह अंबरनाथ नगरपालिका आणि जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच बदलापूर, अंबरनाथ, डोंबिवली, ठाणे येथील औद्यागिक क्षेत्रालाही बारवी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. याच महिन्यात सुरुवातीला झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला होता. तर मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे धरणांमधील पाणीसाठा कमी होतो की काय अशी साशंकता व्यक्त करण्यात येत होती. मात्र आता तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावल्याने धरण क्षेत्रातही समाधानकारक पडला आहे.

सध्या ठाणे जिल्ह्यातील धरणांची स्थिती पाहता मोडकसागर आणि आणि बारवी धरण १०० टक्के भरली आहेत. तानसा धरणामध्येही ९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. भातसा धरणांमध्ये ९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

जिल्ह्यातील धरणे उपलब्ध पाणीसाठा

भातसा ९५ टक्के

मोडकसागर १०० टक्के

तानसा ९८ टक्के

बारवी १०० टक्के

मोरबे धरण काठोकाठ भरण्याच्या उंबरठ्यावर

नवी मुंबई : नवी मुंबई शहराला जलसमृद्धता बहाल करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी साठवण क्षमता १९०.८९० दलघमी इतकी असून, विसर्ग पाणी पातळी ८८.०० मी. इतकी आहे. २५ ऑगस्ट रोजी मोरबे धरणात पाणी पातळी ८७.४० मी.पेक्षा जास्त झालेली आहे. मोरबे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने पर्जन्यवृष्टी सुरू असून असाच पाऊस सुरू असल्याने धरण कोणत्याही क्षणी ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू राहून धरणाची पाणी पातळी ८७.८५ मी. इतकी झाल्यास, धरणाचे दरवाजे उघडण्यात येतील.

येऊन, जादाचे पाणी मूळ धावरी नदी पात्रात सोडण्यात येईल, असे खालापूर तहसीलदार व स्थानिक पोलीस प्रशासन यांस नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभागाच्यावतीने पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. तसेच त्यानंतरही, धरणाची पाणी पातळी ८८.०० मी. इतकी राखण्यासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग करण्यात येईल, असेही सूचित करण्यात आले आहे.

या अनुषंगाने, धावरी नदीच्या तीरावरील विशेषत: चौक, जांभिवली, आसरे, धारणी, तुपगाव, आसरोटी, कोपरी या नदीकाठावरील व पाताळगंगा नदीवरील इतर गावांना याबाबत तहसीलदार कार्यालयाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रतिदिन ४५० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवी मुंबई महापालिकेचे मोरबे धरण काठोकाठ भरत असल्याने ही नवी मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.

logo
marathi.freepressjournal.in