
बदलापूर : बदलापुरातील ज्या शाळेत दोन दिवसांपूर्वी विद्यार्थिनीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला, ती शाळाच अनधिकृत असल्याची व अशाच प्रकारे दहा वर्षांपासून ही शाळा सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बदलापूरमधील एका शाळेत सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा याच शाळेतील शिक्षकाने विनयभंग केल्याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून, त्या शिक्षकाला अटक केली आहे. मात्र या घटनेबद्दल बदलापुरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
महाराष्ट्र बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या नीलिमा चव्हाण आणि महिला बालकल्याण समितीच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी या शाळेला भेट देत संबंधित घटनेची चौकशी केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, ट्रस्टी यांची सखोल चौकशी करण्यात आली.
पीडित मुलीशी व तिच्या आईशीही चर्चा करण्यात आली. याच दरम्यान शाळेच्या परवानगीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असता या शाळेला फक्त पहिलीच्या वर्गाला शिक्षण विभागाची परवानगी असल्याची तसेच गेल्या दहा वर्षांपासून या शाळेत इयत्ता दुसरी पासून ते दहावीपर्यंतचे सगळे वर्ग अनधिकृतरीत्या चालवले जात असल्याची बाब समोर आली आहे.