उल्हासनगरचे हॉटेल व्यावसायिक आसन बालानी यांनी त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर काढलेल्या बजाज अलायन्स जिवन विमा पॉलिसीमध्ये लाखो रुपये जमा होते. रिलेशनशिप मॅनेजर, ब्रँच मॅनेजर आणि कर्मचारी यांनी बनावट सह्या करून जमा रक्कमेतून नविन पॉलिसी तयार करीत फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपींच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसन बालानी यांनी त्यांची आणि पत्नी पूजा बालानी यांची बजाज अलायन्स ह्या जीवन विमा कंपनीची उल्हासनगर शाखेमध्ये वर्षाला प्रत्येकी एक लाखांचा हप्ता असलेला जीवन विमा २०१० मध्ये काढला होता. २०३० मध्ये या जीवन विम्याचे हप्ते पूर्ण होऊन त्याद्वारे बालानी यांना प्रत्येकी ४६ लाख ६१ हजार रुपये मिळणार होते. मार्च महिन्यात बजाज अलायानस कंपनीची कर्मचारी कल्पना तांबे ही आसन बालानी यांच्या घरी आली. त्यांच्या पत्नी पूजा यांचा एक फोटो मोबाईलमध्ये काढला. तसेच केवायसी अपडेट करीत असल्याचे सांगत ओटीपी घेतला. तेव्हा ह्या महिलेने आसन बालानी यांना त्यांच्या विम्यात नुकसान होत असून दुप्पट फायदा हवा असल्यास जुना जीवन विमा तोडण्याची मागणी केली. त्याला आसन यांनी विरोध केला, असे असताना ही त्या दिवशी तीने जुनी विमा पॉलिसी तोडून नवीन जीवन विमा काढला.
पूजा बालानी यांनी विरोध करताच जुनी पॉलिसी कंपनीने रद्द केली. त्यानंतर तात्काळ आसन बालानी यांनी त्यांची पॉलिसी तपासली असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.२०२० मध्ये संगणकाच्या सिस्टीममधून आसन बालानी यांचा मोबाईल नंबर काढून त्यात मिनू झा यांचा मोबाईल नंबर टाकला. तसेच फोटो ही बदलला. त्यानंतर वर्षाला चार लाख रुपयांचा हप्ता असलेले दोन नवीन जीवन विमा काढले. त्याच्या हप्त्याचे पैसे जुन्या जीवन विम्याच्या जमा रक्कममधून वळते केले होते
हा प्रकार आसन बालानी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकरणी आसन बालानी याची चौकशी केल्यानंतर मध्यवर्ती पोलिसांनी आरोपी मिनू झा, सतीश सोनी आणि संतोष तोलानी यांच्याविरोधात ४६ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.