
अगदी सहज पैसा मिळावा आणि त्यावर मौजमजा करता यावी यासाठी दोघांनी सोनसाखळी चोरीची योजना बनवली. कल्याण-डोंबिवली हे शहर ठरवले आणि रात्रीच्यावेळी दुचाकीवरून येऊन रस्त्यावर एकटी महिला दिसल्यावर तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून पोबारा करायचे. असे अनेक दिवस ते करत हाेते. या चाेरीच्या घटनांमुळे पाेलीसही हैराण झाले हाेते. पाेलिसांनी चार ते पाचवेळी सापळा रचला मात्र प्रत्येकवेळी त्यांनी पाेलिसांना चकमा दिला. अखेर ते यावेळी पाेलिसांच्या सापळ्यात अडकले. पाेलिसांनी या दाेघांना अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमेश चहिरालाल पालीवाल आणि महेश पुनाराम जठ अशी या सोनसाखळी चोरांची नावे आहेत. या दोघांवर डोंबिवलीतील मानपाडा, टिळकनगर, विष्णूनगर आणि कल्याण मधील खडकपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. तर मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यांत मिळून एकूण २९ गुन्हे नोंद आहेत. कल्याण-डोंबिवलीत अनेक दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांनी यात तपास करून चोरट्यांना पकडल्याचे ठरविले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हे चोर भिवंडी बायपास मार्गे दुचाकीवरून यायचे. व रात्रीच्या अंधारात पसार व्हायचेे. चार ते पाचवेळा पाेलिसांनी सापळा रचूनही ते सापडले नव्हते. अखेर एका सापळ्यात ते अडकले. ही कामगिरी पोलीस सह आयुक्त, कल्याण परिमंडल -३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, डोंबिवली सहायक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनि शेखर बागडे, सपोनिरी अविनाश वनवे, अनिल भिसे, सुनिल तारमळे, पोहवा राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, भानुदास काटकर, सोमनाथ टिकेकर, सुधीर कदम, पोना संजू मासाळ, प्रविण किनरे, दीपक गडगे, भारत कांदळकर, महादेव पवार, यल्लपा पाटील यांच्या पथकाने केली.