
मुंब्रा बायपासला रस्त्याला ठाण्याकडील उतारावर पुन्हा एकदा खड्डे पडले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी याच दिवसात याच पुलाला मोठे भगदाड पडून पुलाच्यावरील खड्ड्यांमधून सळया बाहेर निघाल्याने पुलाच्या खालचा रस्ता स्पष्ट दिसत होता. विशेष म्हणजे यापूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीवर करोडो रुपयांची उधळपट्टी करण्यात आलेली असताना दुरुस्तीतही मोठा घोटाळा झाला असल्याचे उघड झाले होते. दुरुस्तीच्या वेळी किमान दोन फुटाचे थर टाकण्याची आवश्यकता होती मात्र अवघ्या अर्ध्या फुटाचा थर टाकण्यात आल्याने आता पुन्हा मोठा खड्डा पडल्याने आणि खालच्या सळ्या दिसत असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
उरण, जेएनपीटी बंदरातून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड वाहने बाहेर पडतात. ही वाहने गुजरात, भिवंडी, नाशिकच्या दिशेने वाहतूक करतात. त्यामुळे हा मार्ग अवजड वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. मे २०१८ मध्ये या मार्गाच्या पायथ्याशी असलेल्या पुलाची दुरवस्था झाली होती. यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला होता. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी अधिसूचना काढणे आणि अन्य शहरांतील पोलिसांबरोबर समन्वय साधण्यात दीड महिन्यांचा काळ लोटला होता. अखेर २०१८च्या जुलै महिन्यात दुरुस्तीचे काम सुरू झाले होते. या कामामुळे सहा महिने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.