पालिकेने पालिकेच्या समोरील रोडवर वाहने उभी करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे रोडच्या दोन्ही बाजूला गाड्यांच्या अभावी शुकशुकाट पसरला असून रोडने मोकळा श्वास घेतला आहे.
वर्किंग डे मध्ये नागरिक विविध कामांसाठी, मालमत्ता कर भरण्याकरिता, जन्ममृत्यूचा दाखला काढण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिकेत येतात. तेव्हा ते त्यांच्या दुचाक्या समोरील रोडवर पार्किंग करतात. बडे आसामी पालिकेत येतांना चारचाकी गाड्या उभ्या करतात. त्यामुळे पालिकासमोरील रोडवर गाड्यांची गजबज दिसत होती.
पालिकेत गाडी घेउन येणार्यांची गर्दी अधिक असल्याने गाडी लावण्यासाठी जागा मिळत नसे अशावेळी गेटच्या आजूबाजूला तसेच स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्या समोर मनाला पटेल तिथे गाड्या उभ्या केल्या जात होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी उपआयुक्त सुरक्षा डॉ. सुभाष जाधव यांनी सुरक्षारक्षकांना रोडच्या दोन्ही बाजूला वाहन चालक त्यांची वाहने उभी करताना दिसली तर त्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सुरक्षारक्षकांनी दुचाकी व चारचाकी वाहनास थांबण्यास मनाई सुरू केली आहे.