मुंबई : घाटकोपर पूर्व राजावाडी काॅलनीतील बिल्डिंग नंबर बी ७ / १६६ ही खचली होती. या दुर्घटनेत रविवारी तीन जणांची ढिगाऱ्याखालून काढत सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु दोन जण ढीगाऱ्याखाली अडकल्याने त्यांचा रविवार सकाळपासून शोध सुरु होता. अखेर २४ तासानंतर नरेश पालांडे ( ५६) व अलका महादेव पालांडे (९४) या दोघांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. दरम्यान, एक मृतदेह रात्री १.२५ मिनिटांनी तर दुसरा शव सकाळी ६ वाजता आढळला असून या दुर्घटनेत बेसमेंट मध्ये कुत्र्याचा ही आढळला आहे.
शनिवार सकाळपासून मुंबईत पावसाची बॅटिंग सुरु आहे. अधूनमधून जोरदार सरी बरसत असून मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. परंतु मुंबईत पावसाची सुरुवात झाल्यापासून दुर्घटनांचे सत्र सुरु आहे. रविवारी सकाळी ९.३३ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर पूर्व राजावाडी काॅलनीतील बिल्डिंग नंबर बी ७ / १६६ ही तळ अधिक तीन मजली इमारत खचली. या दुर्घटनेत एकूण पाच जण ढीगाऱ्याखाली अडकले होते. यापैकी तीन जणांची ढिगाऱ्याखालून सुखरुप सुटका करण्यात आली. परंतु दोघा अडकलेल्यांचा शोध अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरु केला. अखेर सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास दोघांचे मृतदेह सापडले. दरम्यान, या घटनेची स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.