
उल्हासनगर : रस्त्यांवरील खड्डे किती धोकादायक ठरू शकतात, याचा प्रत्यय रविवारी संध्याकाळी उल्हासनगरच्या १७ सेक्शन परिसरात आला. लहान बाळासह प्रवास करणाऱ्या दाम्पत्याची दुचाकी रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे घसरली आणि हे तिघेही थेट रस्त्यावर कोसळले. सुदैवाने वाहनाचा वेग कमी असल्याने जीवितहानी टळली. मात्र या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
उल्हासनगरच्या कल्याण-बदलापूर रोडवरील १७ सेक्शन परिसरातून हे दाम्पत्य आपल्या लहान बाळासह दुचाकीवरून प्रवास करत होते. रस्त्यावरील उंचीत तफावत असलेला सिमेंटचा पॅच आणि त्यालगत असलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकीचा तोल सुटला आणि हे तिघे रस्त्यावर फेकले गेले. बाळ आईच्या हातातच होते, परंतु सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झाले नाही.
खड्ड्यांविरोधात वाहनचालकांमध्ये संताप
उल्हासनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वतः गाडी चालवून या रस्त्यांवरून फिरावे, म्हणजे त्यांना जनतेला होणारा त्रास आणि दुःख समजेल, असा सूर वाहनचालकांमध्ये उमटतो आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच स्थिती निर्माण होते, मात्र ठोस उपाययोजना होत नाहीत, असा संताप वाहनचालकांनी व्यक्त केला.