

उल्हासनगर : मतदान जनजागृतीचा संदेश देताना चक्क मतदान प्रक्रियेचीच थट्टा करणारी गंभीर चूक उल्हासनगर महापालिकेकडून झाली आहे. मतदार राजाच्या डाव्या हाताच्या तर्जनी नखावर शाई लावली जाते, हा सर्वमान्य नियम असतानाही महापालिकेने जनजागृतीसाठी लावलेल्या बॅनरवर थेट बोटावर शाई दाखवली. ही बाब लक्षात येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी मतदान जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आकर्षक जनजागृती बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवर मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रथमेश परब यांचा फोटो वापरण्यात आला होता.
मात्र, या बॅनरवरील फोटोमध्ये मतदानाची शाई नखावर दाखवण्याऐवजी थेट बोटाच्या तळव्यावर लावलेली दाखवण्यात आली होती. ही मूलभूत व गंभीर चूक लक्षात येताच नागरिकांनी सोशल मीडियावर तसेच प्रत्यक्ष ठिकाणी प्रशासनावर टीकेची झोड उठवली. मतदान जनजागृती करायची आणि मतदानाची पद्धतच चुकीची दाखवायची?”असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला.
टीकेचा भडका उडताच प्रशासन खडबडून जागे झाले. चूक लक्षात येताच संबंधित बॅनर तात्काळ हटवण्यात आला. मात्र, एवढ्यावरच प्रकरण संपते का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. बॅनरचे डिझाइन, त्याची तपासणी व मान्यता देताना जबाबदारी नेमकी कोणाची होती? अशा चुकीच्या संदेशामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता नाही का? प्रशासनाच्या या भोंगळ कारभाराला जबाबदार कोण? याची स्पष्ट उत्तरे नागरिक मागत आहेत.
नागरिकांची मागणी
एकीकडे मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीचा गजर केला जात असताना, दुसरीकडे अशा निष्काळजीपणामुळे महापालिकेची विश्वासार्हताच धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता तरी प्रशासनाने केवळ बॅनर हटवण्यापुरते न थांबता, जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.