उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या क्रमांक १ च्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये शेकडो मतदारांची नावे जंगलात, ओसाड जागांमध्ये आणि अस्तित्वातच नसलेल्या घरांमध्ये दाखविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दुबार-तिबार नावे, स्थलांतरित व मृत व्यक्तींच्या नोंदी आणि मूळ रहिवाशांना इतर प्रभागात पाठवल्याने मतदार यादीबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. यामुळे या मतदार यादीत सुधारणा करण्याचा इशारा मनसेने निवडणूक विभागाला दिला आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी जारी केलेल्या प्रारुप मतदार याद्यांतील प्रभाग क्रमांक १ मध्ये मोठा घोळ उघडकीस आला आहे. झाडे असलेल्या निर्जन जागांमध्ये, आयडीआय व अमरडाय कंपनीच्या कॉलनी परिसरात शेकडो मतदारांच्या नोंदी असल्याचे आढळले. त्यामुळे मतदार यादीची विश्वासार्हता आणि पारदर्शकतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मतदार यादीतील त्रुटींमुळे मतदानाची टक्केवारी ६०–६५ टक्क्यांपेक्षा वाढत नाही. या घसरत्या मतदानाला उल्हासनगर मनसेच्या निवडणूक विभाग आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची सदोष कार्यपद्धतीच जबाबदार असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील स्थलांतरित व चुकीने समाविष्ट केलेली मतदारांची नावे वगळून प्रभागात वास्तव्यास असलेल्या नागरिकांची नावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावीत, यासाठी विहित मुदतीत हरकत नोंदविण्यात आल्याची माहिती मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख यांनी दिली. राज्याच्या विविध भागात प्रारुप मतदार यादीत गोंधळ दिसत आहेत.