Ulhasnagar : नारळ फुटला, रस्ता खोदला; पण मुहूर्त कधी? भूमिपूजनाचा गाजावाजा; कामाला सुरुवात अन् ठेकेदारच गायब!

विकासकामाच्या नावाखाली मोठ्या थाटामाटात भूमिपूजन झाले, रस्ताही खोदण्यात आला; मात्र त्यानंतर कामाची गती मंदावल्याने नागरिकांच्या नशिबी चिखल, पाणी आणि जीवघेणा प्रवास आला आहे.
Ulhasnagar : नारळ फुटला, रस्ता खोदला; पण मुहूर्त कधी? भूमिपूजनाचा गाजावाजा; कामाला सुरुवात अन् ठेकेदारच गायब!
Ulhasnagar : नारळ फुटला, रस्ता खोदला; पण मुहूर्त कधी? भूमिपूजनाचा गाजावाजा; कामाला सुरुवात अन् ठेकेदारच गायब!
Published on

उल्हासनगर : विकासकामाच्या नावाखाली मोठ्या थाटामाटात भूमिपूजन झाले, रस्ताही खोदण्यात आला; मात्र त्यानंतर कामाची गती मंदावल्याने नागरिकांच्या नशिबी चिखल, पाणी आणि जीवघेणा प्रवास आला आहे. गुरुगोविंद स्कूल ते क्रिटीकेअर हॉस्पिटलदरम्यानच्या रस्त्याचे १३ जुलै रोजी महापौर अश्विनी निकम यांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, महिनाभर उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याने हा मार्ग सध्या चिखलमय झाला आहे.

वर्षानुवर्षे दयनीय अवस्थेत असलेल्या या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, रस्ता खोदून ठेवल्यानंतर कामाची गती मंदावली. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. बांधकाम साहित्यही रस्त्यावर पडून असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक झाली आहे.

विशेषतः शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. दुकानांसमोर पाणी आणि चिखल साचल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनाही मोठा फटका बसत आहे.

काम सुरू असताना आवश्यक बॅरिकेडिंग, धोक्याचे सूचना फलक आणि सुरक्षित पर्यायी मार्गाची व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र, या उपाययोजनांचा अभाव असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

दरम्यान, स्थानिक नगरसेवक आकाश चक्रवर्ती यांनी मुसळधार पावसामुळे रस्त्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आल्याचे सांगितले. पाऊस कमी झाल्यानंतर घाईघाईने नव्हे, तर दर्जेदार आणि टिकाऊ पद्धतीने रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, दुर्घटना घडण्याची वाट न पाहता महापालिकेने तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात आणि रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in