उल्हासनगर खूपच अस्वच्छ; नेमका विकास झाला कुठे? शहरातील स्वच्छतेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी

उल्हासनगर शहराचा विकास झालेला नसून हे शहर खूपच अस्वच्छ असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी उल्हासनगर मधील जाहीर सभेत सांगितल्याने मनपा प्रशासन आणि राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
उल्हासनगर खूपच अस्वच्छ; नेमका विकास झाला कुठे? शहरातील स्वच्छतेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली नाराजी

उल्हासनगर : उल्हासनगर शहराच्या आजूबाजूला असलेले मुंबई , ठाणे एवढेच नव्हे तर कल्याण - डोंबिवली हे विकसित झालेले शहर आहेत त्यामानाने उल्हासनगर शहराचा विकास झालेला नसून हे शहर खूपच अस्वच्छ असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी उल्हासनगर मधील जाहीर सभेत सांगितल्याने मनपा प्रशासन आणि राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.

नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे उल्हासनगर शहरात एका कार्यक्रमानिमित्ताने आले होते. त्यावेळी सभेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. एकीकडे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार डॉ बालाजी किणीकर, कुमार आयलानी, गणपत गायकवाड हे उल्हासनगर शहरात वारंवार करोडो रुपये विकास कामांसाठी खर्च केल्याचे सांगतात मग नेमका विकास झाला कुठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. उल्हासनगरमध्ये आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कार्यक्रमादरम्यान स्टेजवर उपस्थित होते.

उल्हासनगर शहराबाबत बोलायचे झाल्यास हे शहर अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाशी जोडला गेला आहे. या तिन्ही मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, गणपत गायकवाड या कार्यक्रमाला उपस्थित होते. हे तिन्ही आमदार आपापल्या मतदार संघाच्या माध्यमातून उल्हासनगर शहरासाठी करोडो रुपयांचा निधी आल्याचा दावा करीत आलेले आहेत. मग नेमका विकास झाला कुठे? हा प्रश्न अजित पवार यांच्या वक्तव्याने निर्माण झाला आहे. हे वक्तव्य करूनच अजित पवार थांबले नाहीत तर ते म्हणाले की, उल्हासनगरचा विकास का झालेला नाही. याबाबत मी डॉ. बालाजी किणीकर, कुमार आयलानी, गणपत गायकवाड या तिन्ही आमदारांची चर्चा केली. त्यावेळी त्यांनी विविध कारणे सांगितली आहेत, या अनुषंगाने मी मंत्रालयात त्यांच्याशी चर्चा करेल आणि विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासनही अजित पवार यांनी जाहीररित्या दिले. अजित पवार यांच्या वक्तव्य हे अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लागवल्याची चर्चा आहे.

मनपा प्रशासनाच्या कामांवर प्रश्नचिन्ह

अजित पवार यांनी शहरातील स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करून मनपा प्रशासनाची पोलखोल मनपा आयुक्त अजीज शेख, उपायुक्त अशोक नाईकवाडे व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थित केली. त्यामुळे मनपा प्रशासनाने केलेली स्वच्छता अभियान, डीप क्लिनिंग ड्राईव्ह व अन्य उपक्रम यांच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उल्हासनगर महानगरपालिकेने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणार्क वेस्ट हँडलिंग या कंपनीला तब्बल १२ वर्षांपासून कंत्राट दिला आहे. शहरातील विविध भागातून कचरा उचलून डंपिंग ग्राउंड पर्यंत नेण्यासाठी प्रतिदिन या कंत्राटदाराला ४.५ लाख रुपये देण्यात होते. अवघ्या १३ वर्ग किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या उल्हासनगर महापालिकेच्या दृष्टीने हा खर्च खूपच जास्त आहे. एवढा वारेमाप खर्च करून देखील परिस्थितीत काहीच फरक झालेला नाही.

logo
marathi.freepressjournal.in