देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात व उत्साहात साजरे करण्याची जोरदार तयारी सुरू असून प्रत्येक घरात तिरंगा अशी मोहीमच राबवली जात आहे. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाला मोठी मागणी असून दुसरीकडे ध्वज संहितेचे उल्लंघन करून राष्ट्र ध्वज तयार केले गेल्याचे प्रकार समोर आल्याने कारवाईची मागणी होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यास ७५ वर्ष झाल्याने केंद्र व राज्य सरकारने यंदाचा १५ ऑगस्ट रोजीचा स्वातंत्र्य दिवस मोठ्या दिमाखात व भव्यदिव्य असा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्र ध्वजची मोठी मागणी पाहता घाईगडबडीत तसेच देशाच्या भारतीय ध्वजसंहिता २००२ चे सर्रास उल्लंघन केले जात असल्याने राष्ट्र ध्वजाचा अपमान यातून होत आहे. ध्वज संहितेनुसार देशाचा राष्ट्र ध्वज हा आयताकृती असायला हवा व त्याचे आकारा नुसार किती मोजमाप असावे हे ठरवून दिलेले आहे. झेंड्याचा आकार ३ : २ प्रमाणात हवा. झेंड्याच्या भगवा, सफेद व हिरव्या रंगाच्या पट्ट्या देखील समान आयताकार आकाराच्याच असायला हव्यात. त्यातील अशोकचक्र हे नेव्ही ब्ल्यू रंगाचे २४ धारीचे व बरोबर मध्यभागी असायला हवे.