
यंदा पावसाने सुरुवातीलाच ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणातील पाण्याची पातळी खालावंत चालली आहे. सध्या बारवी धरणात अवघा ३१ टक्केच पाणीसाठा असून पावसाने जोर न पकडल्यास ठाणे जिल्ह्याला पाणी कपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदा पावसाला वेळेत सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र यंदा ठाणे जिल्ह्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची नोंद झाली. जुन महिन्यात जिल्ह्यात सरासरी ४०० मिमी पावसाची नोंद होत असते. मागील वर्षी ठाणे जिल्ह्यात ६६६.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. सरासरीच्या १६५.५ टक्के पाऊस पडला होता. त्यामुळे जलस्त्रोतांमध्ये पुरेसा पाणी साठा उपलब्ध झाला होता. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने जलस्त्रोतातील पाणीसाठी झपाट्याने कमी होऊ लागला आहे. जिल्ह्यात २७ जूनपर्यंत अवघ्या ३२.३ टक्के पावसाची नोंद झाली असून अवघा १२९.४ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात पावसाने सरासरी गाठली नाही तर जिल्ह्यावर पाणी कपातीचे संकट ओढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण डोंबिवली, ठाणे, मिरा भाईंदर आणि ग्रामीण भाग तसेच औद्योगिक वसाहतींना बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. आंध्र धरणातून आणि भिवपूर विद्युत प्रकल्पातून येणाऱ्या पाण्यामुळे उल्हास नदीची पाणी पातळी राखली जाते. मात्र कमी पावसामुळे सध्याच्या घडीला जलस्त्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठी नसल्याचे समोर आले आहे.