
ठाण्यात एसआरए व क्लस्टर सारखे प्रकल्प येऊनही "झोपडपट्टी मुक्त ठाणे" अजूनही होत नसून याला पूर्णत: ठाणे महापालिका प्रशासन तसेच अनेक वर्षांपासून सत्तेत असलेला सत्ताधारी पक्ष जवाबदार असल्याचा आरोप ठाणे शहर कॉंग्रेस अध्यक्ष अॅड.विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. सध्याच्या परिस्थितीत ठाण्यात ५० टक्के झोपडपट्टीचे साम्राज्य आहे. प्रशासनाच्या वतीने शहारत विविध योजना राबिवल्या जात आहेत. घरे पूर्ण होण्याची स्वप्न ठाणेकरांना दाखवले जातात, मात्र अजूनही ठाणे झोपडपट्टी मुक्त झाले नसल्याची खंत यावेळी ठाणे काँग्रेसने व्यक्त केली आहे.
मागील आठवड्यापासून ठाणे महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समिती बाहेर ठाणे शहर(जिल्हा) कॉंग्रेसच्या वतीने जनआंदोलन सुरू असून मंगळवारी उथळसर प्रभाग समिती कार्यालयाबाहेर शहर कॉंग्रेसने आंदोलन केले. ब्लॉक अध्यक्ष संदिप शिंदे यांच्या माध्यमातून अपूर्ण नालेसफाई, अनधिकृत बांधकामांवर होत असलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जनआंदोलन करण्यात आले.