महिलेच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण ?सोसायटी आणि महापालिकेचे एकमेकांकडे बोट

महिलेच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण ?सोसायटी आणि महापालिकेचे एकमेकांकडे बोट

झाडाच्या फांद्या छाटुन किंवा महापालिकेच्या यंत्रणामार्फत मुळासकट उपटुन टाकण्याची विनंती करण्यात आली होती

कोलबाड येथील सृष्टी को. ऑप. हौ. सोसायटीच्या आवारात असलेला वृक्ष लगतच्या गणेशोत्सवाच्या मंडपावर कोसळून अर्पिता राजन वालावलकर यांना आपला प्राण गमवावा लागला, तर प्रतिक वालावलकर (वय ३०), सुहासिनी कोलुंगडे (वय ५६), वकीविन्स परेरा (वय ४०), दत्ता जावळे (वय ५०), कु. चईत राघवेंद्र राव (वय) १७) हे किरकोळ जखमी असुन चुवारी केदार कनोजिया (वय ५५), व लालचंद गौंड (वय ६६) हे दोघे जखमी झाले असुन त्यांच्यावर वेलनेस हॉस्पिटल, कोलबाड येथे उपचार सुरु आहेत; मात्र, या दुर्घटनेवरून सृष्टी को. ऑप. हौ. सोसायटी आणि महापालिका प्रशासन आमनेसामने आले असून वालावलकर यांच्या मृत्यूला नेमके जबाबदार कोण ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितनुसार, सृष्टी को. ऑप. हौ. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यानी ठाणे महापालिका आयुक्त व वृक्ष प्राधिकरण अधिकारी यांना पिंपळाचे झाड उंच असल्या कारणाने झाडाच्या फांद्या घाटणे हे काम जोखमीचे असल्याने सोसायटीकडे कुठल्याही प्रकारची यंत्रणा उपलब्ध नसल्याने या पिंपळाच्या झाडापासुन मनुष्यहानी होवू नये यासाठी झाडाच्या फांद्या छाटुन किंवा महापालिकेच्या यंत्रणामार्फत मुळासकट उपटुन टाकण्याची विनंती करण्यात आली होती. यापैकी पहिला अर्ज दि. २४ मे २०२१, दुसरा अर्ज दि. १२ जानेवारी २०२२, तिसरा अर्ज दि. २४ मार्च २०२२ चौथा अर्ज दि. ०७ जुलै २०२२ रोजी करण्यात आला होता. परंतु ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सदर पिंपळाचे झाड कोलबाड मित्र मंडळ सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपाच्या शेड वर पडल्याने हि दुर्घटना घडली असल्याचा आरोप सोसायटीने केला आहे.

दुसरीकडे सोसायटीने केलेल्या अर्जानुसार सदर झाड तोडण्यासाठी एप्रिल २०२२ या महिन्यातच झाड तोडून टाकण्यासाठी महापालिकेला परवानगी देण्यात आली होती; मात्र सोसायटीने झाड तोडले नाही, त्यामुळे हि दुर्घटना घडली असल्याचे वृक्ष प्राधिकरण अधिकारी केदार पाटील यांनी सांगितले. त्यांनी तसा अहवाल तयार केला असून पालिका आयुक्तांकडे पाठवला आहे. यापुर्वी उदयनगर, पाचपखाडी येथेही अशीच घटना घडली होती. सोसायटीने वारंवार तक्रार करुनसुध्दा महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे सोसायटीच्या हद्दीत असणारे झाड कोसळुन किशोर पवार (वय ४०) या व्यक्तीलाही आपला प्राण गमवावा लागला होता. ठाणे पालिकेने त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना महानगरपालिकेच्या सेवेत रुजू करुन घेतले. अशा घटना वारंवार घडत असल्याने ही बाब गंभीर असुन संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली असून मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबियांना ३० लाखाची आर्थिक मदत तातडीने करण्यात यावी, असे पत्र महापालिका आयुक्तांना पाठवले आहे.

महापालिकेच्या धोरणात मदत देण्याची तरतूद नाही

नैसर्गिक आपत्तीत बळी गेल्यास सरकारी तसेच महापालिकेडूनही मदत देण्यात येते झाड कोसळून ज्यांचा बळी गेला त्याच्या कुटुंबियांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळू शकते; मात्र महापालिका कायद्यात नुकसान भरपाई देण्याची तरतूद नसल्याचे महापालिकेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, यापूर्वी किशोर पवार यांच्या मृत्यू नंतर सामाजिक संगठनांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आंदोलने झाली त्यामुळे पवार यांच्या कुटुंबियांना पालिकेच्या सेवेत सामावून घ्यावे लागले होते. आता या प्रकरणावरूनही राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in