
जव्हार सारख्या ग्रामीण भागात रोजगाराची प्रचंड वानवा आहे, रोजगार हमी योजने शिवाय दुसरे काम करण्यासाठी कुशलतेचा अभाव असल्याने रोजगार प्राप्तीसाठी प्रचंड अडचणीला सामोरे जावे लागत आहे परंतु पंतप्रधान गरीब योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे. या योजनेची मुदत ३० सप्टेंबर पर्यंत केली आहे.
तालुक्यातील १३ हजार ४८४ अंत्योदय कुटुंब योजनेतील ७२हजार ९०६ नागरिकांना तर १२ हजार ९२७ प्राधान्य कुटुंब योजनेतील ६७ हजार १९१ अश्या एकूण १४ हजार ९७ नागरिकांना ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत प्रति व्यक्ती ५ किलो धान्य मोफत मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून रेशन कार्ड वर गरिबांना प्रति व्यक्ती महिन्याला एकूण ५ किलो मोफत धान्य मिळत आहे, त्यात ४ किलो तांदूळ व १ किलो गहू असे प्रतिव्यक्ती दिले जात आहे. कोरोना काळात गरिबांना आधार मिळावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च २०२० मध्ये ही योजना सुरू केली होती पण कोरोना नंतर देशात आर्थिक परिस्थिती मात्र बिघडलेली दिसत आहे आता कोरोना पूर्णपणे नियंत्रणात असूनही केंद्र सरकारने ही योजना सुरू ठेवल्याने नागरिकांना मोठा आधार मिळत आहे. नागरिकांना आपल्या कुटुंबातील रेशन कार्ड मधील सदस्यांचे आधार कार्ड जोडणी करण्याचे आवाहन तहसील कार्यालयातून करण्यात येत आहे, परंतु आधार नंबर आणि दुरुस्ती करण्यासाठी आधारच्या वेबसाईट ही क्वचितच चालू असल्याने आधार अपडेट करण्याचे काम केव्हा आटपेल हा विषय गुलदस्त्यातच आहे.