कल्याणमध्ये आगीत गुदमरुन महिलेचा मृत्यू,तीन जण गंभीर जखमी

एका बंगल्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली
कल्याणमध्ये आगीत गुदमरुन महिलेचा मृत्यू,तीन जण गंभीर जखमी
Published on

कल्याण पूर्वेत असणाऱ्या आणि उल्हासनगरातील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या चिंचपाडा गावठाण मधील एका बंगल्याला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. यात महिलेचा गुदमरून मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत.

चिंचपाडा ग्रामपंचायत जवळ सूरज प्लाझा हा म्हात्रे कुटुंबियांचा बंगला आहे. त्यात भावंड एकत्रित राहतात. दोन भावंड हे देवदर्शनासाठी बाहेर गेल्याने बंगल्यात भरत म्हात्रे, त्यांची पत्नी जयश्री म्हात्रे, मुलगा होते. मध्यरात्री ३ च्या नंतर बंगल्याला अचानक आग लागली. त्यात फर्निचरचे पेट घेतल्याने जयश्री म्हात्रे यांचा गुदमरून मृत्यू झाला. तर बचावासाठी आलेले शेजारी तीन जण किरकोळ होरपळले. त्यांना चिंचपाडा कमानी जवळील साई आधार या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव बर्वे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सकाळी उल्हासनगरातील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात जयश्री म्हात्रे यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम केल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने चिंचपाड्यात शोककळा पसरली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक साहेबराव बर्वे पुढील तपास करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in