
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण देशाला जोडले जात आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या रेल्वे विकासात गेल्या दशकभरात ऐतिहासिक बदल घडले आहेत. ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, अशा विविध मागण्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.
लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सोयीसुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्या. महाराष्ट्रातील रेल्वे सेवेला अधिक वेग आणि सुरक्षितता देण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वेमंत्र्यांकडे विविध मागण्या केल्या. कल्याण-पनवेल (कळंबोली मार्गे) लोकल सेवा सुरू करावी. कल्याण-वाशी (ऐरोली मार्गे) लोकल सेवा सुरू करावी, जेणेकरून ठाणे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होईल.
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते उरण लोकल सेवा सुरू करावी. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरहून महिलांसाठी विशेष लोकल सुरू करावी. सर्व स्थानकांवर स्वच्छ आणि दर्जेदार शौचालयांची व्यवस्था करावी. अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ सरकारी व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत. कल्याण, ठाणे, डोंबिवली येथे एडीआरएम स्तराचे अधिकारी नियुक्त करावेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवावे. रेल्वे उड्डाणपूल व अंडरपास प्रकल्प जलद पूर्ण करावेत, अशी मागणी खासदार म्हस्के यांनी केली. राज्यात ११ वंदे भारत गाड्या १९ जिल्ह्यांना जोडत आहेत. तर अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत १३२ स्थानकांचे नूतनीकरण सुरू आहे. ४७ मोठ्या प्रकल्पांसाठी रुपये १,५८,८६६ कोटींची गुंतवणूक आणि १,०६२ नवीन उड्डाण पूल व अंडरपासेसने महाराष्ट्राच्या रेल्वे विकासाला नवी दिशा दिली जात असल्याचे खा. म्हस्के यांनी सांगितले.
वाढीव खर्च रेल्वेने करावा
ठाणे आणि मुलुंड स्टेशनच्या दरम्यान नवीन स्टेशनचे काम सुरू आहे, हे काम रेल्वे करीत आहे. परंतु खर्च ठाणे महानगरपालिका करीत आहे, त्याचा वाढीव खर्च रेल्वेने करावा व अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावेत व नवीन रेल्वेच्या कामाला गती द्यावी. याचबरोबर स्टेशनवरची वन रुपीज क्लिनिक केंद्रे बंद आहेत ती लवकरात लवकर सुरू करावीत. ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण अशा सर्व ठिकाणी ऑटोमॅटिक जिन्यांची सोय करावी, अशा विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या यादीत भारताचा समावेश
१७० वर्षांनंतर, देशाची पहिली बुलेट ट्रेनही ठाणे मार्गे मुंबईला जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबई-ठाणे दरम्यान देशातील पहिली 'अंडर सी टनेल' म्हणजे समुद्राखालून जाणारा बोगदा बांधण्याचे ऐतिहासिक काम सुरू झाले आहे. हे आधुनिक तंत्रज्ञान आजपर्यंत फक्त जगभरात केवळ पाच देशांकडे होते, पण आता त्या यादीत भारताचा देखील समावेश झाला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वामुळे बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला 'व्हाइट एलिफंट' (निरुपयोगी प्रकल्प) म्हणून हिणवले होते अशी टीका म्हस्के यांनी केली. पण आता महाराष्ट्राच्या जनतेला ‘स्पीड ब्रेकर’ नव्हे, तर ‘एक्स्प्रेस-वे’सारखा वेगवान विकास हवा आहे. मोदी सरकारच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होत आहे.
- नरेश म्हस्के, खासदार