'धर्मवीर'चे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? राजन विचारे यांचे मुख्यमंत्र्यांच्या आरोपांवर उत्तर

दुसऱ्या पार्टमध्ये सिनेमात जे काय आहे ते खरं दाखवणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारे यांच्यावर महायुतीच्या मेळाव्यात गंभीर आरोप केले होते.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : धर्मवीर सिनेमात जे काही दाखवले, राजन विचारे स्वत:हून आले, त्यांनी सभागृह नेतेपद दिले हे सर्व खोटे आहे. दुसऱ्या पार्टमध्ये सिनेमात जे काय आहे ते खरं दाखवणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारे यांच्यावर महायुतीच्या मेळाव्यात गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आरोपांना राजन विचारे यांनीही प्रतिउत्तर दिले आहे.

धर्मवीर चित्रपटाचे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा? असा टोला विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २०१३ मध्ये ते पाच आमदारांना घेऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत मी त्यांच्या सोबत होतो; मात्र त्यांना केवळ शिवसेना संपावयाचीच होती, असा गंभीर आरोपही त्यांनी मुख्यमंत्र्यावर केला आहे.

“आम्ही सिनेमा काढला म्हणतात, मात्र आम्ही आमच्या पैशाने तिकीटे काढून सिनेमा दाखवला. खोटे सिनेमा काढता म्हणजे दिघे यांच्यावर त्यांचे किती प्रेम होते हे यातून दिसत आहे, असेही ते म्हणाले. शिंदे यांनी पहिले आमदराकीचे तिकीट मीच मिळवून दिले. असे आरोप करण्यापेक्षा दोन वर्षांत विकास कामे काय केली, ठाण्यासाठी काय काय केले त्याची उत्तरे आधी द्या” असा सवालही त्यांनी केला.

महापौरपदाच्या कारर्कीदीत काय काम केले?

तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी शिवसेना तोडली, कॉंग्रेस, राष्ट्रवादी फोडली. केवळ सेटींगचेच राजकारण तुम्ही केले. नरेश म्हस्के कोरोना काळात कुठे होता, घरात बसून होता, महापौरपदाच्या कारर्कीद काय काम केले हे सांगावे, केवळ गोल्डन गँगचा लिडर म्हणूनच त्याची प्रचिती होती. ठाणे महापालिका लुटण्याचे काम केले. टेंभी नाक्याच्या देवीसमोर लागणारे बॅनर काढून त्याठिकाणी शिंदे यांनी स्वत:चे बॅनर लावले. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली. त्यामुळे दिघे यांच्यावरील प्रेम काय होते, हे मला बोलायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

‘ते आणि त्यांचा मुलगा एवढंच त्यांना माहीत’

मला शिवसेनेत ४० वर्ष झाली, यांचा उदय दिघे साहेब गेल्यानंतर झाला आहे. बाळासाहेबांचे विचार शिवसेना फोडण्यासाठी कधीच नव्हते, मोठं वादळ येऊन सुद्धा त्यांनी पक्ष एकसंघ ठेवला. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचा विश्वास होता; २०१४ च्या निवडणुकीला ठाण्यातील सैन्य घेऊन ते त्यांच्या मुलासाठी कल्याणला गेले. मी एकटा राहून इथून निवडून आलो, ते आणि त्यांचा मुलगा एवढंच त्यांना माहीत होत. असं विचारे यांनी सांगितले. यांना शिवसेना संपवायची होती, राजन विचारे तुमच्या मागे होता म्हणून तुम्हाला आमदारकीच तिकीट मिळाले, असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in