महेश्वरी
डॉ. महेश केळुसकर
माहेरची ओढ, सासरचं वास्तव, नात्यांमधली आपुलकी आणि हळुवार तक्रारी हे सगळं मालवणी लोकगीतांतून अतिशय सहज आणि हृदयस्पर्शीपणे व्यक्त होतात. स्त्रीच्या भावविश्वाला शब्द देणारी ही लोकगीतं लोकजीवनाचा जिवंत दस्तऐवज ठरतात.
गावाची ओढ, माहेरची आठवण, सासू-सासऱ्यांचं मोठेपण, बहीण-भावाचं प्रेम आणि तिटकारा, नणंदा ,सुना, दीर, आई- वडील, भावांचं कौतुक, लाड, हळुवार थट्टा , नर्म विनोद व आपलेपणा मालवणी लोकगीतांतून प्रकट झालेला आहे. एक बहीण आपल्या दुसऱ्या बहिणीचं आणि तिच्या भरताराचं कोड कौतुक कसं करते ते सांगणारं छोटेखानी लोकगीत असं आहे :
विमलबाई गं माजी शेला टाकुनी नीज आली
लाडक्या भरतारे, शेला मारूनी जागी केली
भरतार बाई बोले, माजी मोहना कोठे गेली
विमल गो बाये माझे हसत दारी आली...
आपल्या सासरी विमलाबाई शेला पांघरून गाढ झोपी गेलीय. तर तिचा भरतार म्हणजे नवरा येऊन तिच्या बहिणीला विचारतो, अगं माझी मोहना कुठे गेली? मग ती शेला पांघरून नीजेच्या आधीन झालेली आपली मोहना तो पाहतो. ती त्याला कशी दिसते? तर फुलांमध्ये जसं फूल आणि त्याचा सुगंधी सुवास सर्वत्र पसरलेला अशी! मग तिच्या अंगावरचा शेला तिच्या अंगावरच मारून तो तिला जागी करतो. मग बहीण म्हणते, माझी विमल गं ती माझी बाय ..! तर हसत हसत आपल्या नवऱ्याचं स्वागत करायला विमल दारात येऊन उभी राहते. हृद्य भावना दर्शन मालवणी लोकगीतांचं वैशिष्ट्य आहे.
परघरी राहिलेल्या आपल्या लेकीला माहेरी आणण्यासाठी तिच्या भावाला तिच्या गावी पाठवणारी आई एका कोकणी लोकगीतात भेटत मिरगाचा पाऊस सुरू झालेला आहे. नदीला पूर येईल असं वाटतंय. तर बहिणीचा भाऊ आपल्या आईला सांगतो की ‘आई तू काळजी करू नकोस. मी अशा पावसातूनही बहिणाबाईला आणायला जातो. (हाडूक जातय)’ भावजयही नवऱ्याला इशारा करते की ‘अहो, भरल्या नदीतून पलीकडे जाऊ नका. मृगाचा पाऊस पडतोय ..त्या लोकगीताच्या काही ओळी अशा- मुलगा आईला सांगतोय :
नको आई चिंता करू
बहिणाबाईक हाडूक जातंय
भाऊजा काही बोले
बहिणीचा घे दूर गावू
नदी भरल्या नको जाऊ
पाऊस गे घडोघडी
मिरग गे पाणी भरी
काही लोकगीतांमधून नणंद आणि भावजय यांच्यात प्रेमळ संवाद होतो एका लोकगीतामधली नणंद वहिनीला सांगते आहे की, “अगं दारात चटक चांदणी फुलली आहे.” (संध्याकाळी चटक चांदणी उगवते तेव्हा दिवेलागणीची वेळ झालेली असते.) नणंद सासरला चालली आहे. मग वहिनी नणंदेला विचारते, “तुला तुझ्या सासरी जाताना मी आंदण (आनंद) काय देऊ ? एकावर एक डाळलेली सात ताटं देऊ काय? ते गीत असं:
दारी फुलली चटक चांदणी
वयनी दिवा लावत गे
नणंद चालली सासरला
अनान काय देवू गे
एकावर एक सात ताटा
ननदे जोकता नाय गे
असंही एखादं मालवणी लोकगीत आपल्याला सासूबद्दल व पतीबद्दल भक्तीभाव बाळगणाऱ्या सुनेचं भावविश्व उलगडून दाखवीत आपल्या स्मृतीत कायम वस्तीला येतं. दारातल्या तुळशीला प्रदक्षिणा घालताना एक मालवणी सून तुळशीला म्हणते, हे दारातल्या तुळशी, तुझे चार खूर (बैठक) किती सुंदर आहेत! तसेच माझे चार दीर आहेत. माझा भरतार (नवरा) सूर्यासारखा आहे. माझी सासुबाई तर अशी आहे की तिची निरी सोनेरी आहे. तिच्या पुण्याईने माझ्या कपाळावर लाल चीरी आलेली आहे. तिच्यामुळेच माझ्या कुंकवाला लाल रंग चढला आहे. अगं दारातील तुळशी मी तुला पाणी घालते. पण ते पडतंय तिकडे मात्र माझ्या कुंकवाला लाल रंग चढतो आहे..
माझ्या कुकुमा रंग चढ़े
दारातले गे तुळशी
बागडे ये तुझे खूर
चहू गे माझी वीर
सूर्यासारखे भरतार
माजी नी सासूबाई
सोनेरी तिची नीरी
तिच्याने गे पुण्याईने
माझ्या कपाळी लाल चिरी
दारातले नि गे तुळशी
पाणी पडले एकीकडे
माझ्या कुकुमा रंग चढे
मालवणी स्त्री-पुरुषांना व मुलाबाळांना आपल्या आजोळचं , स्त्रीला माहेरचं फार मोठं अप्रूप असतं. मालवणी लोकगीतात मामा-मामीची थट्टा केलेली दिसून येते. भावा-बहिणीच्या प्रेमाचं आणि जिव्हाळ्याचं दर्शनही होतं. कधी कधी या भावाभोवती गणपतीचं ( गनोबा ) आणि भगवान शंकराचं रूपकही रचलं जातं. गावात ओढा (वहाळ) आहे. ओढ्यावर भाऊ-बहीण आंघोळीला व कपडे धुवायला आलीत. लाडू नावाची मुलगी शृंगार( शिरंगार) करून वहाळावर आली आहे. वहाळावर वरच्या बाजूला भाऊराया आपली धोतरं धुतोय. वहाळाच्या खालच्या बाजूला प्रत्यक्ष गणपती आंघोळ करतोय. मधोमध वहाळावर कपडे धुता धुता बहीण काम थांबवून उभी राहिलीय. ते पाहून लाडूची आई म्हणते:
खालती गनोबा न्हाय धूय गे
वरती भाऊराय धोतर धुता
धुता धुता उभीच ऱ्हवली
एवढा शृंगार (शिरंगार )काय गे
लाडूची आई लाडूला बोले
बुगडी लेऊन घाल गे
जळो तुझी बुगडी बिगडी
शंकर वायच पाव रे
खालती गनोबा न्हाय धूय गे ...
आई लाडूला तिचा शृंगार अधिकच खुलावा म्हणून बुगडी घालायला सांगते. पण लाडू वैतागते. ती म्हणते, जळो तुझी बुगडी बिगडी आणि प्रत्यक्ष शंकर आपल्याला प्रसन्न व्हावा अशी प्रार्थना करते.
एका लोकगीतातील नववधू तरुणीसाठी कोकणी, कुळवाडी, माळवाडी मुलगी दारात चिंचेने बहरलेल्या झाडावर पिकून लालेलाल झालेल्या लाल्लुकाशी बोलते लाल्लुकही तिला उत्तर देत राहतं. चिंचेवरील लाल्लुकाला ही कोकणी वधू म्हणते, “अगो चिचेवयल्या लाल्लुका, मी माहेरी आलेली आहे आणि आता मला सासरी न्यायला सासरचे लोक आलेले आहेत.” मग लाल्लुक तिला विचारते, त्यांनी तुझ्यासाठी काय काय आणलंय?” मुलगी सांगते, साडीचोळी आणलीय. पण मग लगेच ती त्याच सुरात लाल्लुकाशी बोलते. ती सांगते, अगो मला सासरी न्यायला ‘ते’ नव्हे का आलेत.. कळले तुला? लाल्लुक विचारतं, कोण कोण आलेत? मग या काळातली ही मालवणी नववधू रोखठोक सांगते,' माझा घो ( नवरा ) नाही का आलाय! लाल्लुक विचारतं, पण त्यानं नथ बुगडी आणलीय का? पुढे ती त्याच सुरात व लयीत सांगते, मी नथ बुगडी घेणार. नवऱ्याला बसायला पाट नी प्यायला पाणी देणार आणि त्याच्याबरोबर सासरी जाणार... या गीताच्या शेवटचा भाग किती मोहक आहे पहा :
चीचेवयल्या लाल्लुका गो
व्हराक व्हयगो इलेहत
कोण कोण इलेहत ?
घोव न्हय गो इलो हा
काय काय हाडल्यानी..
काय काय हाडल्यानी?
नथ बुगडी हाडली हा
नथ बुगडी घेतलंय
म्हनी पानी देतलंय
तेंच्या वांगडा जातलंय..
जुन्या काळातली माहेर-सासरची कौतुकं आणि कथा-व्यथा जाणून घ्यायच्या असतील तर या लोकगीतांकडे वळण्यावाचून पर्याय नाही. ही अशी लोकगीतं म्हणजे मौखिक साहित्याच्या खजिन्यातील लखलखती रत्नं आहेत.
ज्येष्ठ कवी आणि लेखक
maheshkeluskar@gmail.com