भारताचा रुपया बुधवारी (दि. ३) इतिहासातील नीचांकी पातळीवर घसरत १ डॉलर = ₹९०.२४ वर पोहोचला. रिझर्व्ह बँकेने सतत हस्तक्षेप करूनही रुपयावरील दबाव कमी झाला नाही. त्यामुळे ही मोठी घसरण नोंदवण्यात आली. या घसरणीमुळे राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर "आता कोण गप्प आहे?" असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांचा मोदींना टोला
सुप्रिया श्रीनेत यांनी मोदींचा जुना व्हिडीओ शेअर करत म्हटले, “डॉलर मजबूत आणि रुपया कमजोर, अशा स्थितीत भारत टिकू शकत नाही, असे मोदीच म्हणाले होते. आज रुपयाने ९० चा आकडा ओलांडला आहे, तर याचे उत्तर कोण देणार?” काँग्रेसच्या अधिकृत X हँडलनेही थेट प्रश्न विचारला आहे, “रुपयाची सतत घसरण का होतेय? पंतप्रधान मोदी उत्तर देतील का?”
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या सागरिका घोष यांचा सवाल
सागरिका घोष म्हणाल्या, “रुपयाची नव्वदी पार! २०१३ मध्ये रुपया ६० वर पोहचला तेव्हा नरेंद्र मोदी यांनी मनमोहन सिंग यांची चेष्टा केली होती. आता पंतप्रधान झाल्यावर काय म्हणायचं? आता गप्प कोण आहे, मोदीजी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे यांची टीका
आदित्य ठाकरे म्हणाले, “रुपया ९० च्यावर! काही चलनांसमोर तर आणखी वाईट स्थिती. तरीही अर्थमंत्री शांत. २०१४ चे ‘अच्छे दिन’ बहुतेक इतरांसाठी होते, भारतासाठी नव्हे. भारतासाठी आहे फक्त ‘स्पाय साथी’सारखी स्पाय ॲप्स!”
रुपया का घसरतोय? तज्ज्ञांचे संकेत
तज्ज्ञांच्या मते, वाढता व्यापार तुटवडा, सध्याच्या खात्याचा तुटवडा वाढणे, भारत–अमेरिका व्यापार करारात विलंब, कमकुवत परकीय गुंतवणूक (FPI), आयातदारांकडून वाढलेल्या जोखीमचे व्यवस्थापन ही रुपया घसरण्याची प्रमुख कारणे आहेत.
रिझर्व्ह बँकेने काही दिवसांपूर्वी ९० रुपयांच्या पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता, पण डॉलरची वाढती मागणी पुन्हा रुपयाला खाली खेचत आहे.
आशियातील कमजोर चलनांमध्ये ‘रुपया’
२०२५ मध्ये रुपया ५% पेक्षा अधिक घसरला आहे. सोने-चांदीची आयात वाढल्याने व्यापार तूट ४१.६८ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी १७ अब्ज डॉलरची माघार घेतली आहे.
तज्ज्ञ म्हणतात, “RBI झपाट्याने होणारी घसरण रोखत राहील. परंतु मूलभूत आर्थिक स्थिती सुधारली नाही तर रुपया आणखी कमजोर होऊ शकतो. जागतिक बाजारातील स्थिरता निर्णायक ठरेल.”