

राज्यातील हवामानात पुढील काही दिवसांत मोठे बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मुंबई आणि परिसरात १३ आणि १४ मार्चदरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे, तर राज्यातील काही भागांत १७ ते २० मार्चदरम्यान मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी
हवामान खात्याच्या प्राथमिक अंदाजानुसार, १७ ते २० मार्चदरम्यान राज्यातील काही भागांत दुपारनंतर आभाळ दाटून येण्याची शक्यता आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
१८ ते २० मार्चदरम्यान या हवामान घडामोडींची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे आणि पावसापासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता
दरम्यान, मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) १३ आणि १४ मार्चदरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी हीटवेव्हचा इशारा जारी केला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शुक्रवारी मुंबईतील कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते, तर शनिवारी ते सुमारे ३७ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
दोन आठवड्यांत तिसरा हीटवेव्ह अलर्ट
गेल्या दोन आठवड्यांत हवामान विभागाने तिसऱ्यांदा हीटवेव्हचा इशारा दिला आहे. यापूर्वी ४ ते ५ मार्चदरम्यान उष्णतेची लाट अनुभवली गेली होती, तर ९ ते १० मार्चदरम्यान दुसरा हीटवेव्ह अलर्ट देण्यात आला होता. त्या काळात १० मार्च रोजी सांताक्रूझ वेधशाळेत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जे २०२१ नंतर मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमान मानले जात आहे.
उष्णतेची तीव्रता हळूहळू कमी होणार
हवामान तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्रावर तयार होत असलेल्या अँटी-सायक्लोन प्रणालीमुळे गुजरात आणि उत्तर भागातून कोरडे व उष्ण वारे मुंबईकडे येत आहेत. त्यामुळे तापमान वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र १४ मार्चनंतर उष्णतेची तीव्रता हळूहळू कमी होऊन १५ मार्चपासून तापमान सुमारे ३३ अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.