मनोरंजन

"... त्यांना बघत बघतच आम्ही शिकत होतो"; प्रशांत दामलेंची विजय कदम यांच्या निधनावर प्रतिक्रिया

Tejashree Gaikwad

Prashant Damle: अनेक वर्ष मराठी मनोरंजनसृष्टीत काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज, १० ऑगस्ट रोजी वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. विजय कदम यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत रंगमंचावर आणि पडद्यावर महत्त्वपूर्ण योगदान दिले. १९८० आणि ९०च्या दशकात मराठी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमातून काम केलं. त्यांच्या या प्रवासात मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार त्यांच्याशी जोडले गेले. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते प्रशांत दामले यांनी अनेक जुन्या आठवणी सांगत हळहळ व्यक्त केली आहे.

'एबीपी माझा'शी संवाद साधताना अभिनेते प्रशांत दामले म्हणाले की," ही दुःखद बातमी तर आहे पण ही धक्कादायक बातमीसुद्धा आहे. तसा तो आजारी होता पण इतक्या लवकर बोलावणं येईल असं वाटतं न्हवतं. परवापर्यंत आम्ही भेटत होतो, बोलत होतो." दामले यांनी विजय यांच्याकडून कशी शिकवण मिळाली याबद्दलही आठवण शेअर केली. ते म्हणाले की, "मला पहिल्यांदा शिकायची संधी मिळाली. १९८३मध्ये मी पहिल्यांदा ‘टूरटूर’ नाटकात काम केलं होतं. त्यावेळी लक्ष्मीकांत बेर्डे आणि विजय कदम ही जी जोडी होती ती सुपरहिट होती. त्यांना बघत बघतच आम्ही शिकत होतो. मी, विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आम्ही सगळे या दोघांनाच बघून शिकत होतो. विजय कदम खूप भारी होता. त्याची भाषाशैली उत्तम होती. त्याची रिअ‍ॅक्शनची स्टाइल छान होती. मुळात म्हणजे तो को आर्टिस्टला सपोर्ट देणारा कलाकार होता. तो फारच लवकर गेला असं मला वाटतं. खरंच खूप दुःखदायक आहे.”

"आमच्या खूप आठवणी आहेत. पहिला चित्रपट मी जो केला होता त्यामध्ये मी त्याच्याबरोबर काम केलं होते. नाटकात आपण ज्या रिअ‍ॅक्शन देतो, तशाच पद्धतीच्या रिअ‍ॅक्शन चित्रपटात द्यायच्या नसतात, हे त्यावेळी त्याने मला सांगितलं होतं. अगदी त्याने मला ते प्रात्यक्षिक करून सांगितलं होतं. त्याने मला स्वतः समोर उभारून, बसून "प्रशांत तू हे अशा पद्धतीने कर..." असं समजून सांगितलं होतं. त्यामुळे शिकायची संधी आणि शिकवण्याची त्याची ईच्छा हे फार महत्त्वाचं होतं. " अशी एक खास आठवण प्रशांत दामले यांनी सांगितली.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला