अबू धाबी : पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संयुक्त अरब अमिरातीचे (युएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशी झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत दिले. या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत सात सामरिक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. तसेच, यूएईने भारतात ५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केल्याचेही पंतप्रधानांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या पाच देशांच्या दौऱ्यातील हा पहिला टप्पा असून, ते सुमारे अडीच तास युएईमध्ये थांबले होते. या भेटीत मोदींनी युएईवर झालेल्या इराणच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला. युएईला ज्या प्रकारे लक्ष्य केले जात आहे ते स्वीकारार्ह नाही, मात्र अशा स्थितीत युएईने ज्या संयमाने परिस्थिती हाताळली ते कौतुकास्पद असल्याचे मोदी म्हणाले. पश्चिम आशियातील संघर्षाचा परिणाम जागतिक स्तरावर जाणवत असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. दोन्ही नेत्यांनी ऊर्जा सुरक्षा, पायाभूत सुविधा, जहाजबांधणी आणि प्रगत तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर भर दिला आहे.