माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांचा ट्रॅफिक जाम; गिर्यारोहकांच्या संख्येवर मर्यादा आणा, विक्रमवीर रिता शेर्पा यांची मागणी (संग्रहित छायाचित्र)
आंतरराष्ट्रीय

माऊंट एव्हरेस्टवर गिर्यारोहकांचा ट्रॅफिक जाम; गिर्यारोहकांच्या संख्येवर मर्यादा आणा, विक्रमवीर रिता शेर्पा यांची मागणी

जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या 'माऊंट एव्हरेस्ट'वर सध्या ट्रॅफिक जामची अवस्था आहे.

Swapnil S

काठमांडू : जगातील सर्वांत उंच शिखर असलेल्या 'माऊंट एव्हरेस्ट'वर सध्या ट्रॅफिक जामची अवस्था आहे. २० मे रोजी २७४ गिर्यारोहक शिखरावर पोहोचले, जी नेपाळच्या बाजूने एकाच दिवसात पोहचलेली सर्वोच्च संख्या आहे. त्यामुळे 'एव्हरेस्ट' वर जाणाऱ्या गिर्यारोहकांच्या संख्येवर मर्यादा आणावी, अशी मागणी विक्रमवीर शेर्पा रिता कामी यांनी केली आहे. नेपाळच्या पर्वतारोहण प्रशासनाने एकूण ४९४ गिर्यारोहकांना परवाने यंदा जारी केले आहेत आणि तितकीच संख्या त्यांच्यासोबत असलेल्या शेर्पा मार्गदर्शकांचीही आहे.

याच आठवड्यात विक्रमी ३२ व्यांदा माऊंट एव्हरेस्ट सर करणारे प्रसिद्ध मार्गदर्शक शेर्पा रिता कामी यांनी शुक्रवारी प्रशासनाला शिखरावरील गिर्यारोहकांच्या संख्येवर मर्यादा घालण्याचे आवाहन केले आहे.

चीनने तिबेटकडील मार्ग बंद केल्यामुळे या हंगामात नेपाळच्या बाजूने ८,८४९ मीटर (२९,०३२ फूट) उंच असलेल्या या शिखरावर चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांची संख्या जास्त आहे. एव्हरेस्टवर नेपाळमधील दक्षिण बाजूने किंवा चीनमधील उत्तर बाजूने चढाई करता येते.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गिर्यारोहकांची संख्या जास्त असल्याने खूप गर्दी झाली होती, असे शेर्पा रिता कामी यांनी डोंगरावरून परतल्यानंतर काठमांडू विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले. 'प्रशासनाने या संख्येवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.' गिर्यारोहकांना शिखरावर चढाईचा प्रयत्न करण्यासाठी चांगल्या हवामानाचा खूप कमी कालावधी मिळतो. एकाच निश्चित दोरीला बांधून ओळीत थांबलेल्या लोकांच्या मोठ्या संख्येमुळे तिथे ट्रॅफिक जाम (कोंडी) होण्याचा धोका वाढतो आणि गिर्यारोहकांना जास्त वेळ प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो.

रिता कामी यांचे सर्वात जवळचे स्पर्धक पासांग दावा शेर्पा यांनी शुक्रवारी ३१ व्यांदा हे शिखर सर केले, जी त्यांची या आठवड्यातील दुसरी यशस्वी चढाई होती. ५६ वर्षीय कामी रिता यांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट सर केले होते आणि तेव्हापासून ते जवळपास दरवर्षी ही मोहीम आखत आहेत.

आता पैशामुळे शस्त्रक्रिया थांबणार नाहीत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

मुंबईत ३३ ठिकाणी फ्लड गेट; पूरस्थितीचा इशारा देणारी सेन्सर यंत्रणा उभारणार; २०२९ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

BEST ला जाहिरातींचा आधार; दोन वर्षांत ११४.१३ कोटींचा महसूल जमा

Mumbai : हरित क्षेत्रातील सुविधांसाठी मोजा पैसे! कोस्टल रोड प्रकल्पातील ७० हेक्टर हरितक्षेत्र रिलायन्स फाऊंडेशन विकसित करणार

एसटीच्या पदोन्नती प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या भवितव्याशी खेळ; चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी