आंतरराष्ट्रीय

भारत-पाकिस्तान शांतता प्रस्थापित करण्यात ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका; अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य

अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे म्हटले आहे. तसेच, वॉशिंग्टनच्या इंडो-पॅसिफिक (हिंद-प्रशांत) रणनीतीमध्ये भारत हा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार असून दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

Swapnil S

सिंगापूर : अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी शनिवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यात अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे म्हटले आहे. तसेच, वॉशिंग्टनच्या इंडो-पॅसिफिक (हिंद-प्रशांत) रणनीतीमध्ये भारत हा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार असून दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य सातत्याने वाढत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

सिंगापूर येथे आयोजित 'शांग्री-ला डायलॉग' या सुरक्षा परिषदेत हेगसेथ यांनी गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये झालेल्या लष्करी संघर्षानंतर नवी दिल्ली आणि इस्लामाबाद दरम्यान झालेल्या कराराचा उल्लेख केला आणि तणाव कमी करण्यासाठी ट्रम्प यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. दोन अण्वस्त्र सज्ज देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूंना एकत्र आणण्याची क्षमता ट्रम्प दाखवून दिली आहे, असे हेगसेथ म्हणाले.

मध्यस्थीचा दावा फेटाळला

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही देशांमध्ये चार दिवस लष्करी संघर्ष झाला होता. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या संघर्षानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण मदत केल्याचा दावा ट्रम्प यांनी वारंवार केला आहे. मात्र, भारताने नेहमीच हा करार दोन्ही देशांमधील थेट चर्चेतून झाल्याचे स्पष्ट केले असून कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला आहे.

लष्करी क्षमतेचे कौतुक

सिंगापूर परिषदेत शिष्टमंडळाला संबोधित करताना हेगसेथ यांनी भारताच्या वाढत्या लष्करी आणि औद्योगिक क्षमतेची प्रशंसा केली. इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारत हा एक वाढता आणि अत्यंत महत्त्वाचा सुरक्षा भागीदार असल्याचे त्यांनी सांगितले. भारत आपल्या सशस्त्र दलांचे आधुनिकीकरण करत असून विशेषतः हिंद महासागर क्षेत्रात शक्तीचा समतोल राखण्यास मदत करत आहे, असे त्यांनी नमूद केले. उच्च दर्जाच्या लष्करी मोहिमा दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी भारत आपली औद्योगिक आणि लॉजिस्टिक क्षमता वाढवत आहे. भारतासोबत लष्करी क्षमता आणखी मजबूत करण्यासाठी आम्ही सह-उत्पादनाला प्राधान्य देण्यास कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.

३२० मीटर लांब सायकल ट्रॅक, पादचारी, पर्यटकांसाठी रस्ता ; कोस्टल रोड प्रकल्पात नव्याने समावेश; स्थायी समितीत वादळी चर्चा होण्याची शक्यता

उरणवर पाणीसंकटाचे सावट; रानसई धरण आटले, मृत साठ्यातून पाणीपुरवठा सुरू

Mumbai : गरीबनगरच्या जागेवर आता स्वतंत्र रिक्षा मार्गिका; पश्चिम द्रुतगती मार्गापर्यंत थेट उन्नत मार्ग, BMC चा प्रस्ताव आयुक्तांना सादर 

Mumbai : धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या मदतीने महिलेची प्रसूती; मध्य रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे बाळ-माता सुरक्षित

Thane : मृत्यूशी झुंजणाऱ्या बिबट्याला जीवनदान; वन विभागाची थरारक बचाव मोहीम यशस्वी